13 जणांचे मृतदेह हाती : लष्कराचे 30-40 जवान ढिगाऱयाखाली गाडल्याची भीती : उर्वरितांचा शोध सुरू
इंफाळ / वृत्तसंस्था
पूर्वोत्तर राज्य मणिपूरमध्ये बुधवारी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनाचा फटका सामान्य लोकांसह अनेक प्रादेशिक लष्कराच्या जवानांना बसला. तुपुल रेल्वेस्थानकाजवळ घडलेल्या भीषण भूस्खलन दुर्घटनेत एक लष्कराची छावणी ढिगाऱयाखाली गेली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तर, अजूनही 45 हून अधिक लोक ढिगाऱयाखाली दबले गेले आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 19 जणांचे प्राण वाचले आहेत. भूस्खलनात डोंगरमाथ्यावरील ढिगारा मोठय़ा प्रमाणात कोसळल्यामुळे इजेई नदी रोखली गेली आहे. या रोखलेल्या पाण्यामुळेही धोका वाढण्याची संभावना आहे.
मणिपूरमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. नोनी जिह्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी रात्री 107 प्रादेशिक लष्करी छावणी भूस्खलनाच्या तडाख्यात आली. या अपघातानंतर डझनभर जवान मातीत गाडले गेले. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी याबाबत तातडीची बैठक बोलावली आहे. या घटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाचीही नजर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आदी नेतेमंडळी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. घटनास्थळावरून वेळोवेळी बचावासंबंधीचे अपडेट्स केंद्र सरकारला पुरविले जात आहेत.
रेल्वे लाईनच्या बांधकामावेळी दुर्घटना
जिरीबामला इंफाळशी जोडण्यासाठी एक रेल्वेमार्ग तयार केला जात होता, ज्याच्या सुरक्षेसाठी 107 टेरिटोरियल आर्मीचे जवान तैनात करण्यात आले होते. बुधवारी रात्री येथे मोठय़ा प्रमाणात भूस्खलन झाले. ज्यात अनेक जवान गाडले गेले. गुरुवारी सकाळी लष्कर, आसाम रायफल्स, मणिपूर पोलिसांनी मोठय़ा प्रमाणावर बचावकार्य सुरू केले. जखमींच्या मदतीसाठी डॉक्टरांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
नोनीच्या उपायुक्तांकडून निवेदन
नोनीच्या उपायुक्तांनी गुरुवारी सकाळी जारी केलेल्या निवेदनात, तुपुल यार्ड रेल्वे बांधकाम शिबिरात झालेल्या दुर्दैवी भूस्खलनामुळे 50 हून अधिक लोक ढिगाऱयाखाली गाडले गेल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जखमींना नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. खराब हवामानामुळे बचाव मोहिमेत अडचणी येत आहेत. लष्कराचे हेलिकॉप्टरही घटनास्थळी पोहोचले आहे.
नदीमार्गातील मातीमुळे धरणसदृश परिस्थिती
ढिगाऱयांमुळे इजेई नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे नोनी जिल्हा मुख्यालयातील सखल भागात पाणी साठण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने जवळच्या गावकऱयांना खबरदारी घेण्याचा आणि लवकरात लवकर जागा रिकामी करण्याचा सल्ला दिला आहे. एकाच ठिकाणी पाणी साचल्याने धरणसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तो फुटला तर सखल भागात अधिक विनाश होऊ शकतो.
संततधार पावसाचे सत्र सुरूच
आसाम आणि मणिपूरसह अनेक ईशान्येकडील राज्यांमध्ये संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसाममध्ये 10 दिवसांत आतापर्यंत 135 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोक बाधित झाले आहेत. त्याचवेळी, हवामान खात्यानुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर आणि सिक्कीममध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्मयता आहे.