ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Landslides in Sikkim गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आज सकाळी सिक्कीममध्ये मोठय़ा प्रमाणात भूस्खलन झाले. या भूस्खलनाचा जवळपास 550 पर्यटकांना फटका बसला असून, ते महामार्गावर अडकले आहेत. लष्कराकडून या पर्यटकांसाठी मदतकार्य राबविले जात आहे.
भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूस्खलनामुळे भारत-बांग्लादेश सीमा आणि गंगटोकला सिलीगुडीमार्गे जोडणारा राष्ट्रीय महामार्ग खराब झाला आहे. रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात दरड आहे. जदलगतीने या मार्गावरील दरड हटविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. हा महामार्ग सिक्कीम आणि पश्चिम बंगालला जोडतो. त्यामुळे या मार्गावरुन जाणारे जवळपास 550 पर्यटक अडकून पडले आहेत. स्ट्रायकिंग लायन डिव्हिजनच्या तुकडय़ांकडून त्यांना अन्न, पाणी पुरविले जात आहे. तसेच ज्यांची प्रकृती ठीक नाही, अशा लोकांना औषधे पोहोचवण्यात येत आहेत.
अधिक वाचा : देशात परतीच्या मान्सूनचा धुमाकूळ, ऑक्टोबरमध्ये सोळा राज्यात अतिवृष्टी
दरम्यान, या भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे या राज्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात आणखी दरड कोसळण्याची शक्यता आहे.