ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिंदेंना समर्थन करणाऱ्या आमदारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात चिंता आहे. दररोज आमदार सेनेची साथ सोडत आहेत. यावर संजय राऊत यांनी आता बंडखोर आमदारांविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याची घोषणा केलीय. तसेच लोकशाही आणि बहुमत हे आकड्यांवर चालते. पण मी पुन्हा सांगतो, आकडा आणि बहुमत फार चंचल असतं. ज्या दिवशी ते आमदार मुंबईत येतील, त्यानंतर त्यांच्या निष्ठेची, बाळासाहेबांवरील भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी लागेल, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत. संजय राऊतांनी (Sanjay Raut) आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
शिंदे यांच्या १२ समर्थक आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवावे, अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे गुरुवारी रात्री करण्यात आल्याचं संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच पुढे बोलताना, “संख्याबळ अधिक असू शकतं पण ते कागदावर. आता ही कायदेशीर लढाई होणार आहे. आता त्यांचं सरकार कधी बनणार हे मला माहिती नाही. बनणार की नाही हे सुद्धा माहिती नाही,” असंही राऊत म्हणाले आहेत.
हेही वाचा : राजेश क्षीरसागरांच्या बंडाने कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक
ही आता कायदेशीर लढाई आहे. काही नियम आहेत. काही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत. आता ही कायदेशीर लढाई आहे. काय होतंय ते पाहू ना, शेवटी त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. त्यांच्याबरोबर काही आमदार आहेत. कोण म्हणतात ४० आहेत, कोण म्हणतात १४० आहेत. जे असतील ते असतील, पण महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकसंध आहेत. शिवसेनेचा आकडा कमी झालेला आहे. लोकशाही आणि बहुमत हे आकड्यांवर चालते. पण मी पुन्हा सांगतो, आकडा आणि बहुमत फार चंचल असतं. ज्या दिवशी ते आमदार मुंबईत येतील, त्यानंतर त्यांच्या निष्ठेची, बाळासाहेबांवरील भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी लागेल, असंही ते म्हणालेत.
सरकारचा सभागृहात हा विषय येईल तेव्हा महाविकास आघाडीच्या बाजूनं आमदारांचा कौल असेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आता लोक धमकी देतायत. शरद पवारांना धमकी देण्यापर्यंत काही लोकांचा माज वाढलेला आहे. या लोकांनी पूर्वी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आम्हाला सगळ्यांना धमक्या दिलेल्या आहेत. धमक्या देऊ द्या ही ज्याची त्याची संस्कृती आहे. पण ही भाजपची संस्कृती आहे का?, शरद पवार साहेबांना घरी जाऊ देणार नाही, असा धमकी देणारा कोणी महाराष्ट्रात असेल, तर त्याचा विचार मोदी आणि शहांना करावा लागेल. या देशात लोकशाही आहे, त्यांना स्वातंत्र्य आहे. शरद पवारांसारख्या नेत्यांना पंतप्रधान मोदीजी मानतात, जगभरात मानतात, जे महाराष्ट्राचे सुपुत्र आहे, चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवण्यासाठी जशा धमक्या देत असाल, आम्हाला द्या धमक्या आम्ही समर्थ आहोत. पण त्यांच्या वयाचा, त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या तपस्येचा जर तुम्हाला आदर नसेल, तर मला असं वाटतं आपण मराठी म्हणवून घ्यायला नालायक आहोत, असंही त्यांनी सांगितलं.