राज्यभरात आज नागपंचमी,श्रावणातला पहिला सण
प्रज्ञा मणेरीकर /पणजी
श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागाबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रूजविण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. यादिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रs नेसून नागदेवाची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद चंदनाने, नाग, नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दूध, लाहय़ा, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात.
राज्यात आज साजरी होत आहे नागपंचमी! शेतात देखील पीक संरक्षणात सापाला शेतकऱयाचा मित्र मानले जाते. त्यामुळे नागपंचमीला शेतकरी शेतात पूजा करतो. याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे. नागपंचमीच्या दिवशी शेतकरी शेतात काम करीत नाहीत. तसेच खणण्याचे कोणतेही काम केले जात नाही. त्यासोबत या दिवशी चिरू नये, कापू नये तसेच चुलीवर तवा ठेवू नये असेही सांगितले जाते. काही ठिकाणी उकडीचा नैवेद्य तर जास्ततः नागदेवतेला पातोळय़ा हा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखविला जातो.
मध्यमवर्गीयांकडे साजरी केली जाते नागपंचमी
नागपंचमी ही गोव्यात काही मध्यमवर्गीयांकडे साजरी केली जाते. नागपंचमीच्या दिवशी सामान्य लोक जमीन खणत नाहीत. एक समजूत अशी लोकमानसात आहे की, नाग हे पुरूष तत्त्व आणि भूमी ही स्त्राr तत्त्व आहे. नागपंचमीच्यादिवशी शेतातील धान्याला बीज येतात. एका महिन्यानंतर हे बीज तयार होते. त्यादृष्टीने नागपंचमी मध्यमवर्गीयांमध्ये साजरी केली जाते. सध्या या उत्सवाला व्यावसायिक स्वरूप आले आहे. पूर्वी ज्यांच्याकडे गणपती बसतो अशांकडे नागपंचमी साजरी केली जायची आणि अजूनही होते. परंतु आता सर्वांकडे गणपती बसतो त्यामुळे नागपंचमी सर्वांकडे केली जाते, अशी माहिती लोककलेचे गाढे अभ्यासक पद्मश्री विनायक खेडेकर यांनी दिली.
ज्याठिकाणी नागपंचमी होते त्याठिकाणी वारूळाची किंवा ज्याठिकाणी गणपतीची मूर्ती बनवितात तिथून चिकणमाती आणून घरात नागाची मूर्ती तयार करून तिची पूजा करण्यात येत असे. या पूजेला काहीही विधी किंवा पुरोहिताची गरज नसते. पाटावरती या प्रतिमेची पूजा करून तिथं त्याला दूध नैवेद्य म्हणून ठेवले जायचे. पण ते दूध परत वापरले किंवा प्यायले जात नाही कारण त्यात सापाचे विष उतरते अशी समजूत आहे.
पातोळय़ा हा प्रकार काही कुटुंबातच
नागपंचमीला केल्या जाणाऱया पातोळय़ा हा गोडाचा प्रकार काही कुटुंबातच केला जात असे. गोव्यात अनेक ठिकाणी पातोळय़ा हा प्रकार नागपंचमीला केला जात नाही. हा गोडाचा प्रकार मात्र तांदळाच्या पीठापासूनच केला जातो. गोव्यात तांदूळ पिकतो. परंतु पूर्वी जे सोजीसारखे चविष्ट गोडाचे प्रकार व्हायचे त्यासाठी धान्य बाहेरून येत असे. सामान्यांकडून धार्मिक कार्यासाठी तांदळाचा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येक विधीसाठी तांदळाचे पीठ आवश्यक मानले गेले. त्याच्यातूनच पातोळय़ा आल्या. पातोळय़ा हा प्रकार गोव्याचे राज्य पक्वान्न व्हावे अशाप्रकारचे ते आहे. कारण तांदूळ, नारळ, आणि गूळ गोव्यातला असल्यामुळे या साहित्यातून होणारे एकमेव पक्वान्न म्हणजे पातोळय़ा.
ख्रिस्ती लोकांमध्येही पातोळय़ांची संस्कृती
काही ख्रिस्ती लोकांमध्ये नाताळ सणाच्यादिवशी, 15 ऑगस्टला अनुषसायबीणीचे फेस्त यादिवशी पातोळय़ा करतात. महाराष्ट्रात नागपंचमीला उकडीचे मोदक नैवेद्य म्हणून दाखविले जाते. नागपंचमीला तांदळाच्या पिठापासून काहीतरी गोड करावे यासाठी पातोळय़ा हा प्रकार करण्यात येतो.
गोमंतकीय संस्कृतीत नागाला मानले जाते ‘जाग्याचो देव’
नागपंचमीच्या दिवशी शेतजमिनीत किंवा साध्या जमिनीत खणले जात नाहीत कारण नाग दुखावला जातो अशी समजूत आहे. गोव्याच्या या संस्कृतीमध्ये ‘जाग्याचो देव’ म्हणजेच स्थलदेवता मानले जाते. त्यामुळे नागाची हत्या केली जात नाही अशी माहिती खेडेकर यांनी दिली.