ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील 9 विरोधी नेत्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रात भाजपच्या नेत्यांकडून विरोधकांवर ईडी, सीबीआय यासारख्या तपासयंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या कारवाईमुळे तपास यंत्रणेच्या विश्वासार्हतेला तडा जात असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. ईडी, सीबीआय यासारख्या तपासयंत्रणांचा ससेमिरा त्यांच्या मागे लावला जातो. पण जेव्हा हे नेते भाजपात प्रवेश करतात, तेव्हा त्यांच्यावरील कारवाई थांबते. हे लोकशाहीला धरुन नाही. तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. यामुळे केंद्रीय यंत्रणांची प्रतिमा मलीन होत असून, त्यांच्या विश्वासार्हतेलाही तडा जात आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारीला दीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली. मात्र, त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा दाखवण्यात आला नाही. 2014 पासून ज्या नेत्यांवर कारवाई झाली, त्यापैकी बहुतांश नेते विरोधी पक्षातील आहेत. या पत्रातून राज्यपालांमुळे केंद्र आणि राज्यातही तणाव वाढल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जनतेने निवडून दिलेल्या सरकारच्या कामात राज्यपाल हस्तक्षेप करत होते. त्यामुळे केंद्र आणि राज्यांमध्ये दुरावा निर्माण झाला , असेही या पत्रात म्हटले आहे.
अधिक वाचा : गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफांची उच्च न्यायालयात धाव; हेतुपुरस्पर कारवाईचा आरोप
या पत्रावर शरद पवार, उद्धव ठाकरे, यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, टीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव, टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी, सपा नेते अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या सह्या आहेत.