पंतप्रधान मोदी यांचा आत्मविश्वास, घराणेशाहीवर टीका
वृत्तसंस्था/ हैद्राबाद
घराणेशाहीचा कारभार आणि कमालीचा भ्रष्टाचार याला तेलंगणातील जनता कंटाळली असून राज्यात कमळ फुलल्याखेरीज राहणार नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. हैद्राबादमधील बेगमपेट विमानतळावर भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर ते बोलत होते. आगामी काळात तेलंगणामध्ये सत्तांतर घडून भाजप बहुमताने सत्तेवर येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भारतात सर्वत्र घराणेशाहीचा पराभव होत आहे. घराणेशाहीच्या मानसिकतेत सत्ता गृहित धरली जाते. तसेच सत्तेचा उपयोग जनतेसाठी न करता घराण्याच्या प्रति÷sसाठी आणि लाभासाठी केला जातो. तेलंगणामध्येही असेच होत आहे. घराण्याची सत्ता आणि भ्रष्टाचार हे जनतेचे दोन सर्वात मोठे शत्रू आहेत. त्यांना गाडल्याखेरीज भाजप विश्रांती घेणार नाही. गरिबांची लूट करून जे स्वतःच्या तिजोऱया भरत आहेत, त्यांना आम्ही कधीही क्षमा करणार नाही. त्यांचा अंत ठरलेला आहे. लोक संधीची वाट पाहात आहेत, असेही वक्तव्य त्यांनी केले.
मुख्यमंत्री अंधश्रद्धाळू
हैद्राबाद हे अत्याधुनिक माहिती-तंत्रज्ञानाचे अग्रस्थान मानण्यात येते. तथापि, येथील मुख्यमंत्री आपले निर्णय अंधश्रद्धांच्या आधारावर घेतात. मंत्रिमंडळात कोण असावे आणि मंत्रिमंडळातून कोणाला काढावे? याचा निर्णय मंत्र्यांच्या गुणवत्तेवर न घेता तो अंधश्रद्धाळू पद्धतीने घेतला जातो. ही बाब हास्यास्पद आहे. व्यक्तिगत श्रद्धांचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मात्र, प्रशासनामध्ये अंधश्रद्धा आल्यास जनतेला परिणाम भोगावे लागतात, अशीही टिप्पणी पंतप्रधान मोदींनी केली.