पदाधिकाऱ्यांच्या जागृती दौऱ्याला आजपासून सुरुवात
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक येथील शिवस्मारकात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळराव देसाई होते. यावेळी सचिव सीताराम बेडरे यांनी संजय पाटील यांची खजिनदारपदी निवड झाल्याचे घोषित केले व त्यांना कामकाज पाहण्यासाठी सूचना केल्या. यावेळी संजय पाटील यांचा पदाधिकाऱ्यांनी हार घालून सत्कार केला.
29 जानेवारीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पदाधिकाऱ्यांनी समितीची पत्रके वाटण्यासाठी दौरा सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी पाच उपाध्यक्ष, सेक्रेटरी व खजिनदार यांनी शनिवारपासून प्रत्येक जिल्हा पंचायतीच्या दहा गावात जाऊन पत्रके वाटून जागृती करण्याचे ठरले. तसेच 51 हजार रुपये देणगी देऊन समितीकडे निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांना उमेदवारांनी सकाळी 10 ते 2 या वेळेत दि. 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याच्या ठरावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. सचिव आणि खजिनदार हे इच्छुकांचे अर्ज स्वीकारतील, असे ठरविण्यात आले. या बैठकीला कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, सेक्रेटरी सीताराम बेडरे, खजिनदार संजीव पाटील, उपाध्यक्ष जयराम देसाई, कृष्णा मन्नोळकर, अर्जुन देसाई, मारुती गुरव, प़ृष्णा कुंभार हे पदाधिकारी उपस्थित होते.