तज्ञ डॉक्टर राहणार उपस्थित : तालुक्यातील जनतेने शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी /खानापूर
खानापुरातील सरकारी दवाखान्याच्या आवारात सोमवार दि. 25 एप्रिल रोजी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात सर्वप्रकारच्या सांसर्गिक व असांसर्गिक रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधाचाही पुरवठा करण्यात येणार आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी संजय नांद्रे यांनी शुक्रवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या शिबिराचा तालुक्यातील जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या शिबिरात सांसर्गिक, असांसर्गिक तसेच दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. तसेच त्यांना कायमस्वरुपी औषधोपचारासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रामुख्याने मधूमेह, रक्तदाब, कॅन्सर, कुष्ठरोग, हाडांचे रोग, त्वचा रोग, क्षयरोग, मलेरिया, टीव्ही यासारख्या रुग्णांची प्रामुख्याने शिबिरात तपासणी केली जाणार आहे. तसेच गर्भवती महिला, लहान बालके यांच्यावरही चिकित्सा केली जाणार आहे. या तपासणीनंतर प्रत्येक रुग्णांना औषधोपचारही केला जाणार आहे. याशिवाय सदर शिबिरात केंद्र शासनाच्या आयुष्य मंत्रालयाकडून मिळणाऱया योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच संबंधित तज्ञ डॉक्टरांकडून आयुर्वेदीक पद्धतीने उपचार केले जाणार आहेत. होमिओपथीक उपचाराचाही या शिबिरात समावेश राहणार आहे, अशी माहिती डॉ. संजय नांद्रे यांनी दिली.
औषध विक्रीसाठी स्टॉल उघडणार
याशिवाय आयुष्मान भारत तसेच हेल्थ कार्ड योजनेंतर्गत आयुष्मान हेल्थ कार्डचेही या शिबिरात वितरण केले जाणार आहे. यावेळी होमिओपथीक, आयुर्वेदीक, ऍलोपथिक औषधांचे प्रदर्शन, त्यांची विक्री व्यवस्था करण्यात आली असून आयुष्मान खात्याकडून निर्माण केलेल्या विविध प्रकारच्या औषधांची विक्री देखील करण्यासाठी स्टॉल उघडण्यात येणार आहेत.एकूणच खानापुरात भरवण्यात येणारे महाआरोग्य शिबिर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला लाभदायक ठरणार आहे. यावेळी हलशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्याधिकारी मंजुनाथ दलवाई उपस्थित होते.
शासनाकडून विविध योजनांतर्गत देण्यात येणाऱया योजनांचा लाभ घ्यावा, बीपीएल व एपीएल कार्डधारकांना शासनाच्या आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. त्यांचीही माहिती यावेळी देण्यात येणार आहे. तसेच जटील रोगांसंदर्भात तज्ञ डॉक्टरांकडून समुपदेशनही करण्यात येणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांद्रे यांनी केले आहे.