गोवा फॉरवर्डचा आरोप, केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिणार पत्र
प्रतिनिधी/ पणजी
पोलीस शिपाईसाठीच्या भरती परीक्षेत नापास झालेले उमेदवार लगेच दुसऱया दिवशी झालेल्या उपनिरीक्षक परीक्षेत 500 पेक्षा जास्त गुण मिळवून पास होतात हा प्रकारच धक्कादायक असून पोलीस खात्यातील या मेगा भरतीत मेगा घोटाळा झाल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. त्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून ही नियुक्ती रद्द करण्याची मागणी करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पणजीत पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पीएसआय भरती घोटाळा हा गुन्हेगारी कट असून त्यात राजकारणी आणि अधिकारी सामील असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या भरतीप्रक्रियेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी, तसेच या घोटाळ्यास सामील असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर दोषींवर कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पोलीस अधिकाऱयांच्या म्हणण्यानुसार, विभागाच्या अंतर्गत तपासात उपनिरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत हेराफेरी झाल्याचे समोर आले आहे. शारीरिक क्षमता चाचणीत अनुत्तीर्ण होऊनही दोन उमेदवारांना पात्र घोषित करण्यात आले. तसेच लेखी परीक्षेत 95 ते 99 गुण मिळाल्याने काही उमेदवारांच्या मनात शंका निर्माण झाली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
यापूर्वीही पोलीस खात्यात उपनिरीक्षकपदाच्या भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याची टीका झाली होती व प्रथमदर्शनी त्यात तथ्य असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यानंतर सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस महासंचालकांनी उपअधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली पाच वेगवेगळय़ा समित्या स्थापन केल्या, अशी माहिती सरदेसाई यांनी दिली.