सैन्य कमांडर्स परिषदेला संरक्षणमंत्र्यांनी केले संबोधित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पूर्व लडाखमधील चीनसोबतच्या तणावादरम्यान बुधवारी सैन्याची तयारी नेहमी उच्चस्तरीय असावी असे आवाहन सैन्य कमांडर्सना उद्देशून केले आहे. सैन्य कमांडर्सच्या उच्चस्तरीय द्विवार्षिक परिषदेत बोलताना संरक्षणमंत्र्यांनी देशातील सर्वात विश्वासार्ह अन् प्रेरक संघटनांपैकी एक भारतीय सैन्याबद्दल अब्जावधी लोकांना असलेला विश्वास पुन्हा अधोरेखित केला आहे.
सैन्य कमांडर्सच्या परिषदेला सोमवारी प्रारंभ झाला असून 11 नोव्हेंबरपर्यंत ती चालणार आहे. यात सैन्य कमांडर्स हे चीन अन् पाकिस्तानला लागून असलेल्या सीमांवरील भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आव्हानांची व्यापक समीक्षा करत आहेत. तसेच वर्तमान सुरक्षा व्यवस्थेसमोरील आव्हानांच्या सर्व पैलूंवर व्यापक विचारविनिमय केला जात आहे. या परिषदेत वर्तमान आणि भविष्यातील सुरक्षा विषयक धोक, परिवर्तन, शस्त्रास्त्र प्रणालींमधील वृद्धी इत्यादी मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली आहे.
परिषदेच्या तिसऱया दिवशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्याच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत चर्चा केली आहे. सुरक्षा अन् राष्ट्रीय सार्वभौमत्व निश्चित करण्यासाठी एक उच्चस्तरीय संचालन तत्परता कायम राखण्याच्या दृष्टीकोनातून भारतीय सैन्याचे कौतुक संरक्षणमंत्र्यांनी केले आहे. भारतीय सैन्य आणि त्याच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.