मल्लिकार्जुन खर्गे यांची उपरोधिक टिप्पणी
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी हे दररोज काँग्रेसला चार क्विंटल शिव्या देत असतात. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या नेत्यांबद्दल ते आक्षेपार्ह टिप्पणी करत असल्याचा दावा खर्गे यांनी केला आहे. खर्गे यांनी वडोदरा जिल्हय़ातील वाघोडिया शहरात काँग्रेस उमेदवार सत्यजीत सिंह गायकवाड यांच्या प्रचाराकरता एका सभेला संबोधित केले आहे. तत्पूर्वी पंचमहल जिल्हय़ातील कलोल येथील सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेत्यांकडून शिव्या देण्यात येत असल्याचा आरोप केला होता.
काँग्रेस नेत्यांनी अपमान केल्याचा दावा मोदी वारंवार करत असतात. माझ्यावर आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांवर पंतप्रधानांबद्दल अपशब्द उच्चारल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातो. कधीकधी मोदी हे स्वतःला गरीब म्हणवून घेत असतात. मोदी हे कधीपर्यंत गरीब म्हणवून घेत राहणार? सुमारे साडेतेरा वर्षांपर्यंत ते गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आणि मागील 8 वर्षांपासून पंतप्रधान असणारा व्यक्ती गरीब कसा असू शकतो असे प्रश्नार्थक विधान खर्गे यांनी केले आहे.
जर दोन दशकांपर्यंत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यासारख्या पदांवर राहूनही मोदी गरीबच असतील, तर दलित, गरीब आणि आदिवासी लोकांच्या दुर्दशेची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. मोदी हे केवळ ‘सहानुभूती’ मिळविण्यासाठी अशाप्रकारचे दावे करत असतात. मोदींनी निवडणुकीदरम्यान विकासाचा मुद्दा उपस्थित करणे अपेक्षित असल्याचे खर्गे यांनी म्हटले आहे.
काँग्रेस आपल्याला प्रतिदिन दोन किलोग्रॅम शिव्या देत असल्याचा दावा मोदी करतात. परंतु मोदी हेच काँग्रेसला दररोज चार क्विंटलइतक्या शिव्या देत असतात हेच सत्य आहे. मोदी हे कधी मला, तर कधी सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांना लक्ष्य करत असतात. आम्हाला शिव्या वाहिल्याशिवाय मोदींना अन्न पचत नसावे अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली आहे.
काँग्रेसने 7 दशकांपयंत भारतात लोकशाही आणि राज्यघटना सुरक्षित ठेवली नसती तर मोदी आणि त्यांचे मित्र कधीच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री होऊ शकले नसते. काँग्रेसच्या शासनकाळात उभ्या करण्यात आलेल्या संपत्ती मोदी सरकार विकू लागले आहे. भूतकाळात आमच्या पक्षाने निर्माण केलेल्या गोष्टी मोदी हे आता विकू लागले आहेत. बंदर, विमानतळांसारख्या संपत्ती विकून मोदी हे काँग्रेसने मागील 70 वर्षांमध्ये काय केले अशी विचारणा करत आहेत. तुम्ही जे काही विकत आहात, ते आम्ही निर्माण केले होते असे मोदींना सांगू इच्छितो असे उद्गार खर्गे यांनी काढले आहेत.