चोर्लाघाटबाबत उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांचा नवीन आदेश : रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत अवजड वाहतुकीला मुभा
वार्ताहर /कणकुंबी
बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्यापैकी साखळी ते कर्नाटक हद्द म्हणजे चोर्लापर्यंतच्या रस्त्यावरून अवजड वाहनांना गोवा शासनाकडून दि. 22 सप्टेंबर 2022 ते 19 मार्च 2023 पर्यंत बंदी घालण्यात आली होती. परंतु सदर बंदी आदेशात फेरबदल करण्यात आला असून, रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीला मुभा देण्यात आली आहे. हा नवीन आदेश मंगळवार दि. 27 सप्टेंबर रोजी उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी मामू हागे यांनी बजावला आहे.
गेल्या आठवडय़ापासून चोर्ला मार्गावरील अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे चोर्ला मार्गावरील ऐंशी टक्के अवजड वाहतूक बंद झाली होती. परंतु, केवळ चारच दिवसात सदर आदेशामध्ये फेरबदल करून नवीन आदेश काढण्यात आल्यामुळे ‘पुन्हा येरे माझ्या मागल्या’ असेच चित्र स्पष्ट होणार आहे.
चोर्लाघाट राष्ट्रीय महामार्गावरील साखळी जंक्शन ते कर्नाटक हद्दपर्यंत (चोर्ला) अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. दत्तवाडी साखळी जंक्शन ते चोर्लाघाट गोवा हद्द तसेच पीएचसी साखळी जंक्शन ते चोर्लाघाट गोवा हद्द आणि होंडा जंक्शन ते चोर्लाघाट गोवा हद्द असा या मार्गाचा आदेशामध्ये समावेश असून या मार्गावरून अवजड व्यावसायिक वाहनांना 19 मार्च 2023 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या मार्गावरील अवजड वाहतुकीला बंदी घातली असली तरी अद्याप या मार्गावरून काही अंशी अवजड वाहतूक सुरूच
होती.
रस्त्याची दुर्दशा
बेळगाव-चोर्ला-पणजी हा गोव्याशी जोडणारा अतिशय जवळचा रस्ता असल्याने या मार्गावरून अनेक प्रकारची हजारो वाहने दररोज ये-जा करतात. वास्तविक 15 ते 20 टन वजन वाहतुकीची क्षमता असलेला हा रस्ता असून गेल्या आठ दहा वर्षांपासून या मार्गावरून जवळपास 35 ते 40 टन वजन वाहतूक करणारी अवजड वाहने धावत आहेत. त्यामुळे रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. गोवा शासनाने चोर्ला रस्त्याबाबत घेतलेला निर्णय योग्यच होता. परंतु केवळ चारच दिवसांत उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांनी सदर आदेशात फेरबदल केला. दिवसभर अवजड वाहतुकीला बंदी तर रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत या मार्गावरील अवजड व्यावसायिक वाहतूक सुरू राहणार आहे. त्यामुळे पुन्हा या मार्गाचे तीन तेरा होणार आहे.
कर्नाटक प्रशासन अपयशी…
बेळगाव-चोर्ला-पणजी या मार्गावरील कुसमळीनजीकच्या मलप्रभा नदीवरील ब्रिजवरून अवजड वाहतूक करण्यास बंदी असल्याचा फलक लावला आहे. परंतु ही 40 टनाची अवजड वाहने या मार्गावरून सुरू आहेत. पिरनवाडी ते कुसमळी मलप्रभा नदीपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. रस्त्याची क्षमता पंधरा ते वीस टनांपर्यंत आहे परंतु या मार्गावरून प्रमाणापेक्षा जास्त अवजड वाहतूक होत असते. परंतु या अवजड वाहतुकीला प्रशासनच जबाबदार आहे. त्यामुळेच या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. आता बेळगाव-चोर्ला-पणजी मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केला असून या रस्त्याच्या पुनर्बांधकामाचे काम लवकरच सुरू होणार आहे.