अनेक शाळा मैदानांच्या प्रतीक्षेत : जेमतेम जागेत खेळांचा सराव : आरटीईनुसार शाळांमध्ये मैदान असणे गरजेचे
प्रतिनिधी / बेळगाव
खेळ हे आरोग्याला सुदृढ आणि मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी खेळविले जातात. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये मैदाने असणे गरजेचे आहे. शहरात मैदाने नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे तुटपुंज्या जागेत अनेक विद्यार्थ्यांना खेळांचा सराव करावा लागतो. आरटीई कायद्यांतर्गत शाळांमध्ये मैदान असणे आवश्यक आहे. तशा प्रकारची तरतूदही कायद्यामध्ये करण्यात आली आहे. परंतु शहर व उपनगरातील अनेक सरकारी शाळांमध्ये मैदान उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची दरवर्षी परवड सुरू आहे.
दरवर्षी शिक्षण खात्याकडून विभागवार क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. यामध्ये विभागवार शाळा सहभागी होतात. मात्र या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सराव करण्यासाठी पुरेसे मैदान सर्रास शाळांमध्ये नसल्याने विद्यार्थ्यांना सराव करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही वर्षांपूर्वी सरकारी शाळांमधील विद्यार्थी विविध प्रकाराच्या क्रीडा प्रकारात भाग घेऊन राज्यस्तरापर्यंत नाव कमवत होते. परंतु गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला असता एकाद दुसरा विद्यार्थीच चमकला जात आहे. ही खंत वाटणारी गोष्ट असून शाळांना मैदाने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांना मैदानाअभावी खुल्या जागेवर करावा लागतोय सराव
शाळांमध्ये शारीरिक शिक्षण हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. तसेच शैक्षणिक वर्षामध्ये खेळांसाठी काही तास राखून ठेवले जातात. परंतु शहराचा फेरफटका मारला असता काही मोजक्या शाळा सोडल्या तर अनेक विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी मैदान उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या भागात उपलब्ध असलेल्या मैदानांवर किंवा एखादी जागा खुली असेल तर त्या ठिकाणी सराव करावा लागत आहे. शहरातील काही विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी ग्रामीण भागांमध्ये जावे लागत आहे, ही बाब चिंताजनक आहे.
शहर व उपनगरांत मैदान उपलब्ध नसल्याने काही शाळांच्या आवारात जाऊन विद्यार्थी खेळताना दिसतात. मात्र शाळा आवारातील जागा अतिशय कमी असते. तसेच विद्यार्थ्यांबरोबरच खेळणाऱया युवकांमुळे शाळांचे दरवाजे, खिडक्या आदींचे नुकसान होत आहे. जादातर विद्यार्थी फुटबॉल किंवा क्रिकेट अशा प्रकारचे सांघिक खेळ खेळतात. त्यामुळे चेंडू लागून खिडक्या-दरवाजे यांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळेच्या कंपाऊंडला कुलूप लावल्यानंतर भिंतीवर चढून विद्यार्थी शाळेच्या आवारात प्रवेश करतात, असे दिसून येत आहे. जागा उपलब्ध नसल्यामुळे खेळण्यासाठीचा हा सारा खटाटोप आहे. यासाठी सरकारकडून मैदाने उपलब्ध करण्याची गरज आहे. मात्र सध्या तरी महानगरपालिकेच्या हद्दीत जागाच नसल्यामुळे मैदानांसाठी जागा देणार तरी कोठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यार्थ्यांनी कोठे सराव करावा?
शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळेला मैदान उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र शहरातील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या शाळा सोडल्या तर सर्रास शाळांमध्ये मैदान उपलब्ध नाही. शाळांमध्ये शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमही शिकविला जातो. त्यासाठी विद्यार्थ्यांना गुणही दिले जातात. सर्वच शाळांना यासाठी अनुदानही देण्यात येते. शाळांमध्ये खेळण्यासाठी साहित्यही उपलब्ध आहे. काही शाळांमध्ये शारीरिक शिक्षकांची नेमणूकही करण्यात आली आहे. मात्र मैदान उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना कोठे सराव करावा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही शाळांच्या आवारात तर युवक दारू पिणे, सिगारेट ओढणे, असेही प्रकारही करीत आहेत. त्यामुळे शाळांच्या आवारात कचराही साचत आहे. त्यामुळे शिक्षकांनी वेळोवेळी याबाबत शिक्षण खात्याच्या अधिकाऱयांना सांगून देखील याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे शिक्षकही हतबल झाले आहेत. कारण कित्येकदा तळीरामांना जास्त झाली की बाटल्या वगैरे फोडून काचा करतात. त्यामुळे अशा प्रकारांकडेही आळा घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.