विशाल कदम / सातारा :
खंडाळ्याचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्याकडे तात्पुरता सातारा पंचायत समितीचा पदभार आलेला आहे. त्यांनी आपल्या नावाची पाटी सभापतींच्या केबीनबाहेर लावलेली आहे. त्यांनी तालुक्यातील 194 गावच्या ग्रामसेवकांचा आढावा स्व. अभयसिंहराजे भोसले सभागृहात घेतला. या आढावा बैठकीला तालुक्यातील बहुतांशी ग्रामसेवकांची गैरहजेरी होती. या आढाव्यात घरकुले, माझी वसुंधरा अभियान, महिला बालकल्याण, समाजकल्याण, पशुसंवर्धन आदी योजनांचा आढावा घेण्यात आला. मात्र, पंचायत समितीच्या आवारात अस्वच्छतेचे साम्राज्य असून वाघमारे साहेब तुम्हीच याकडे जरा बघा, अशी आर्जव होत आहे.
सातारा पंचायत समितीला सगळय़ात कठीण कालखंड हा तत्कालिन गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांचा गेला. त्यांच्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांची कमी आणि स्वतःच्या केबीनकडे त्यांचे लक्ष ज्यादा होते. त्यातच कोरोनाचा कार्यकाळ असला तरीही नागरिकांशी, पदाधिकाऱ्यांशी एवढा त्यांचा संवाद नव्हता. त्यांची बदली झाल्याने कर्मचाऱ्यांमध्येही थोडेसे आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या बदलीनंतर तात्पुरता कार्यभार हा खंडाळय़ाच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. वाघमारे साहेब आठवडय़ातून ठराविक दिवस सातारा पंचायत समितीत येऊन आढावा घेतात. संबंधितांना सूचना करतात. शुक्रवारी त्यांनी मासिक बैठक ग्रामसेवकांची घेतली. त्या बैठकीला सातारा तालुक्यातील अनेक ग्रामसेवकांची गैरहजेरी होती. त्या बैठकीत प्रत्येक ग्रामसेवकांकडून आढावा घेतला. त्यामध्ये घरकुलांची प्रकरणे किती आलेली आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजनांचे किती प्रस्ताव आले आहेत. बांधकाम विभागाकडील किती कामे अपूर्ण आहेत. जी जी कामे अपूर्ण आहेत ती कामे तातडीने मार्गी लावा, माझी वसुंधरा अभियानाच्या अनुषंगाने ग्राम कमिटय़ा स्थापन केल्या का, अशा सूचना त्यांनी दिल्या. मात्र, अनेक ग्रामसेवकांची गैरहजेरी या आढावा बैठकीला होती.
अधिक वाचा : साताऱ्याला आणखी एक दत्ता जाधव परवडणार नाही
खिलारी यांनी दिल्या सूचना
माझी वसुंधरा अभियानाच्या अनुषंगाने नुकतीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी व्हीसी घेऊन सूचना दिल्या होत्या. मात्र, सातारा पंचायत समितीच्या आवारात अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याने त्याकडे वाघमारे साहेब बघणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.