रणजी ट्रॉफी ः मुंबईची उत्तराखंडवर 794 धावांची आघाडी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
डावखुरा स्पिनर शम्स मुलानीने पाच बळी मिळविल्यानंतर यशस्वी जैस्वालने नोंदवलेल्या रणजी स्पर्धेतील पहिल्या शतकामुळे मुंबईने उपांत्यपूर्व लढतीच्या तिसऱया दिवशी उत्तराखंडवर भक्कम स्थिती प्राप्त केली आहे. तिसऱया दिवशीअखेर मुंबईने एकूण तब्बल 794 धावांची आघाडी मिळवित उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे.
मुंबईने पहिला डाव 8 बाद 647 धावांवर घोषित केल्यानंतर उत्तराखंडचा पहिला डाव मुलानीच्या (39 धावांत 5 बळी) भेदक गोलंदाजीपुढे 114 धावांत आटोपला. त्यामुळे मुंबईला 533 धावांची भरभक्कम आघाडी मिळाली. मात्र कर्णधार पृथ्वी शॉने फॉलोऑन न देता दुसरा डाव सुरू केला. दुसऱया डावात 20 वर्षीय यशस्वी जैस्वालने प्रथमश्रेणीतील पहिले शतक (103) नोंदवले तर पृथ्वी शॉने 80 चेंडूत 72 धावा फटकावल्या. दोघांनी पहिल्या गडय़ासाठी 115 धावांची भागीदारी केली. याशिवाय आदित्य तरेनेही 57 धावा जमविल्या. दिवसअखेर मुंबईने दुसऱया डावात 3 बाद 261 धावा जमविल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक ः मुंबई प.डाव 8 बाद 647 डाव घोषित, उत्तराखंड प.डाव 114 (मुलानी 5-39, मोहित अवस्थी 2-22), मुंबई दु.डाव 3 बाद 261 (यशस्वी जैस्वाल 103, पृथ्वी शॉ 72, आदित्य तरे 57, अरमान जाफर खेळत आहे 17, सुवेद पारकर खेळत आहे 6).