नगर, पुणे / प्रतिनिधी :
काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांच्या पाठोपाठ पक्षाचे निष्ठावान नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही नाव न घेता प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात (Nana Patole) सूर आळवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनामा दिल्यानंतर पटोले यांच्याकडे काँग्रेसकडून राज्याच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, या ना त्या कारणाने पटोले कायम चर्चेत राहिले. काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनीही पटोलेंबाबत वेळोवेळी नाराजी व्यक्त केली असून, मागच्या काही दिवसांत ही नाराजी वाढल्याचे दिसत आहे. मध्यंतरी काँग्रेसचे विदर्भातील नेते आशिष देशमुख यांनी थेट पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली होती. राज्यातील काँग्रेसमध्ये बेबंदशाही सुरू असल्याचा आरोप करीत त्यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा पटोले टीकेचे धनी बनले आहेत. पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून सत्यजित तांबे यांनी थेट पटोले यांनाच लक्ष्य केले. त्याचबरोबर त्यांच्यावर आरोपांच्या फैरीही झाडल्या. त्यानंतर तांबे यांचे मामा व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आपले मौन सोडत पक्षातील काही गोष्टींबद्दल उघड नाराजी व्यक्त केली आहे.
अधिक वाचा : पुणे पोलीस करणार 823 किलो अमली पदार्थ नष्ट
माझ्या आजारपणाचा फायदा घेऊन मधल्या काळात पक्षात विचित्र राजकारण झाले. मला थेट भाजपात ढकलण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप करतानाच या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या राजकारणामुळे मी व्यथित झालो आहे. माझी मते मी पक्षश्रेष्ठींना कळविली आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर सत्यजित तांबे यांचे मोठय़ा मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदनही केले आहे. थोरात हे काँगेसचे निष्ठावान व मवाळ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी अप्रत्यक्षपणे पटोले यांच्यावर निशाणा साधल्याने आगामी काळात पटोले यांच्याविरोधातील सूर टीपेला पोहोचणार का, याबाबत औत्सुक्य आहे.