ऑनलाईन टीम/ तरुण भारत
मुंबई: नवी मुंबईमध्ये 400 झाडांची कत्तल रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपाकडून मोर्चा काढण्यात आलायं. दोन्ही पक्षांचे मोर्चे समोरासमोर येण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते याठिकाणी जमले आहेत. भाजपाचे नेतृत्व गणेश नाईक करत आहेत. तर राष्ट्रवादीच्या मोर्चाचे नेतृत्व जितेंन्द्र आव्हाड करत आहेत. जागतिक पर्यावरणाच्या निमित्ताने हे आंदोलन करण्यात आले आहे.
नव्या पुलासाठी नवी मुंबईतील 400 झाडे तोडण्यात येणार आहेत. या झाडांच्या कत्तलीचा प्रस्ताव राज्य सरकारने काढला होता. वाशीतील अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपुलापर्यंतच्या प्रस्तावित उड्डाणपुलाचे बांधकाम होणार आहे. त्यासाठी या झांडांचा बळी जाणार आहे. राज्य सरकार 350 कोटी खर्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे.ही झाडे तोडली जाऊ नयेत यासाठी दोन्ही पक्षांनी आज आंदोलन केले आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी झाडाला मिठ्टी मारत चिपको आंदोलन केले आहे.
नव्या पुलाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. त्यांच्या सुरात सुर मिसळून राष्ट्रवादीने देखील चिपको आंदोलन केले आहे. त्यामुळे मविआमध्ये एकी नसल्याचे बोलले जात आहे. त्य़ातच येत्या काही महिन्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. नवी मुंबईत होणाऱ्या पुलाने राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नवी मुंबईत सिंग्नल आहेत. ट्राफिक जाम होत नाही. तरीही पुलाचा का घाट घातला जातो असा सवाल कार्यकर्त्यातून उपस्थित केला जात आहे. आमचा विकासाला विरोध नाही पण पर्यावरणाचा ऱ्हास होवू नये असा आमचा उद्देश आहे. म्हणून आज आम्ही चिपको आंदोलन करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.