ऑनलाईन टीम/तरुण भारत
ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) प्रश्न प्रलंबित असल्याने राज्यातील अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम झाला. मात्र बुधवार २० जुलै रोजी ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती खानविलकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी ‘वॉर्ड पुनर्रचनेचा मुद्दा निवडणूक आयोगाने पाहावा’, असे सर्वोच्च न्यायालयाने केले. शिवाय, ‘बांठिया अहवालानुसार निवडणुका घ्या’, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. कोर्टाच्या या निर्णयांनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडीच्या प्रयत्नांचा विजय असल्याची प्रतिक्रया दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या अहवाल मान्य करत त्यानुसार स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्याचा दिलेला आदेश हा राज्यातील ओबीसी बांधवांच्या हक्कांचा आणि महाविकास आघाडी सरकारने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे.
ओबीसी आरक्षणाच्या तत्कालिन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार तसेच अन्य नेत्यांनी ओबीसी आरक्षणासाठीची लढाई आज यशस्वी करुन दाखवली. शरद पवार (Sharad Pawar) यांनीही त्याकाळात राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आणि राज्यात ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाला. ते आरक्षण अबाधित राहिले याचा मनापासून आनंद आहे, असेही अजित पवार म्हणाले.
हे ही वाचा : ‘मविआ’मुळे ओबीसींनी राजकीय आरक्षण मिळालं- छगन भुजबळ
ओबीसी आरक्षणासाठी ठाम भूमिका घेण्याचे काम सुरुवातीपासून आम्ही केले. हीच भूमिका यापुढेही कायम राहिल. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी दिलेला मानवतेचा, सामाजिक न्यायाचा विचार महाराष्ट्रात सदैव जिवंत राहील, हा विश्वास सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयातून पुन्हा एकदा दृढ झाला आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या कल्याणासाठी घेतेलेले निर्णय व सुरु केलेल्या योजना यापुढेही सुरु राहतील, याची काळजी विरोधी पक्ष म्हणून निश्चित घेऊ असे सांगतानाच राज्यातील ओबीसी बांधवांच्या एकजुटीतून तसेच संपूर्ण महाराष्ट्राने ओबीसी आरक्षणाला दिलेल्या एकमुखी पाठिंब्याच्या बळावर हे यश मिळाले आहे. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवूया अशा शब्दात ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा दिलेल्या सर्वांचे आभार अजित पवार यांनी मानले आहेत.