ओबीसी संघटनेच्यावतीने मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार
प्रतिनिधी/सातारा
ओबीसी आरक्षण राजकीय पातळीवर मान्य करण्यात आल्याने इच्छूकांच्या आता आशा पल्लवीत झालेल्या आहेत. जिह्यातील नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूका लढवू इच्छीत असलेल्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे. आता निवडणूकीच्या तयारीला ओबीसीचे नेते लागले आहेत.
जिह्यात सातारा पालिकेसह बहुतांशी नगरपालिकांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाच्या कारणास्तव स्थगीत करण्यात आल्या होत्या. यापूर्वी ओबीसी आरक्षण नसल्याने अनेक ओबीसी समाजातील इच्छूकांनी खुल्या प्रवर्गातून लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राजकीय आरक्षण आता हक्काचे मिळाल्याने ओबीसी समाजातील इच्छूकांनी सरकारचे आभार मानले असून निवडणूकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. आरक्षण नव्हते तेव्हा खुल्या प्रवर्गातून उमेदवारी भरणे आणि फाईट देणे मोठे जोखमीचे काम बनले होते. आता मात्र, आरक्षणामुळे सातारा पालिकेत 13 उमेदवार हे ओबीसी समाजाचे असणार आहेत. ओबीसी प्रवर्गामुळे निवडणूक लढवताना येणारा खर्चही कमी असणार आहे. शहरात ओबीसी आरक्षणाचे प्रभाग पुन्हा जाहीर होतील काय याकडे आता नजरा लागून राहिल्या असून राज्य सरकार यावर नेमका काय निर्णय घेते त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सरकारचे आभार मानतो
आम्ही रस्त्यावरची लढाई लढत होतो. मीडियाने आमच्या लढय़ाचे वृत्त प्रसिद्ध केल्याने ते सरकारपर्यंत पोहचवले. त्याबद्दल मीडियाचे आणि सरकारचे आभार मानतो.- भरत लोकरे ओबीसी जिल्हाध्यक्ष