ग्राम पंचायत हद्दीतील 30 फुटी रस्त्यावर वाहने पार्क करण्यात येत असल्याने अडथळा : रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या
प्रतिनिधी /बेळगाव
शहराबरोबर आता उपनगर आणि ग्रामीण भागातदेखील अपार्टमेंट संस्कृती रूजू लागली आहे. विशेषतः महापालिका व्याप्तीलगत गावांमध्ये आणि नगरांमध्ये अपार्टमेंट उभारणी होत आहे. मात्र या ठिकाणी पार्किंगची सुविधा केली जात नसल्याने अपार्टमेंटमधील रहिवासी रस्त्यावर वाहने पार्क करीत आहेत. परिणामी रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
महापालिका व्याप्तीमध्ये बहुमजली इमारती बांधण्याचे प्रमाण वाढले आहे. जुनी घरे हटवून त्या ठिकाणी नवीन इमारती बांधण्याकडे कल वाढला आहे. रहिवासी आणि व्यापारी बहुमजली संकुले उभारण्यात येत आहेत. रस्त्याची रुंदी, भूखंडांचा आकार या तत्त्वावर बांधकाम नियमावलीनुसार बहुमजली इमारत बांधकामासाठी महापालिकेकडून परवानगी दिली जाते. तसेच बहुमजली इमारतींमध्ये पार्किंगसाठी राखीव जागा ठेवणे बंधनकारक आहे. काही ठिकाणी नियमावलीचे पालन केले जाते. तर काही वेळा दुर्लक्ष करून बहुमजली इमारती उभारण्यात येत आहेत. मात्र आता बहुमजली इमारती उभारणीचे लोण ग्रामीण भागातदेखील वाढले आहे.
विशेषतः महापालिका व्याप्तीलगत असलेल्या उपनगरांमध्ये बहुमजली इमारतींचे बांधकाम मोठय़ा प्रमाणात होत आहे. महापालिका व्याप्तीच्या सभोवती असलेल्या ग्राम पंचायतीची हद्द वाढ करण्यात आली नाही. गावठाण परिसरात भूखंड नसल्याने शेती-जमिनींचा विनियोग बिगर शेतीमध्ये करून भूखंड घातले जात आहेत. काही ठिकाणी शेती-जमिनींमध्येच इमारती उभारण्यात येत आहेत. त्यामुळे उपनगरांची संख्या वाढली आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील विजयनगर, जयनगर, समर्थनगर, ओमकारनगर, लक्ष्मीनगर, डिफेन्स कॉलनी, रक्षक कॉलनी, अशा वसाहती निर्माण झाल्या आहेत. तसेच बेनकनहळ्ळी ग्राम पंचायत परिसरात गणेशपूर, सरस्वतीनगर, महालक्ष्मीनगर, पार्वती ले-आऊट अशा विविध वसाहती निर्माण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे कंग्राळी खुर्द आणि कंग्राळी बुद्रुक आदी परिसरातदेखील नव्या वसाहतींची स्थापना झाली आहे. अशा वसाहतींमधील बिगर शेती भूखंडावर बहुमजली इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे.
बांधकाम नियमावली धाब्यावर
विशेषतः हिंडलगा व बेनकनहळ्ळी ग्राम पंचायत हद्दीत येणाऱया वसाहतींमधील बहुमजली इमारतींतील फ्लॅटना अधिक मागणी आहे. त्यामुळे या परिसरात असलेले बंगले किंवा जुन्या इमारती हटवून त्या ठिकाणी बहुमजली रहिवासी संकुले उभारण्यात येत आहेत. शहराच्या आणि ग्राम पंचायतीच्या विकासासाठी ही बाब चांगली आहे. मात्र ग्राम पंचायत हद्दीत बहुमजली इमारतींचे बांधकाम करताना बांधकाम नियमावली धाब्यावर बसविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात बहुमजली इमारत बांधकामासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. पण ग्राम पंचायत हद्दीत परवानगीसाठी कमी कागदपत्रे लागत असल्याने या भागात रहिवासी संकुलांची संख्या वाढली आहे.
बहुमजली रहिवासी संकुल उभारण्यासाठी रस्त्याची रुंदी आणि जागेचा आकार यावर परवानगी देण्यात येते. ग्राम पंचायतीला तीन मजल्यापर्यंत बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार आहे. मात्र हिंडलगा आणि बेनकनहळ्ळी ग्राम पंचायत हद्दीत पाच ते सहा मजल्यापर्यंतचे बांधकाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 30 फुटी रस्ता असलेल्या ठिकाणी 5 मजल्यापर्यंतच्या इमारतीला परवानगी मिळत आहे. तसेच रहिवासी संकुल उभारण्यासाठी संकुलातील रहिवाशांकरिता पार्किंग सुविधा उपलब्ध करणे बंधनकारक आहे. याकरिता तळमजला पार्किंग करता राखीव ठेवणे आवश्यक आहे. मात्र हिंडलगा व बेनकनहळ्ळी ग्राम पंचायत हद्दीतील बहुमजली इमारतींमध्ये पार्किंगची जागा राखीव ठेवण्यात आली नसल्याने वाहनधारक रस्त्यावर पार्किंग करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
30 फुटाच्या रस्त्याशेजारी बहुमजली इमारत उभारण्यात येत आहे. अशातच या इमारतीमधील सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहने समोरील रस्त्यावर पार्क जात आहेत. त्यामुळे रस्त्यावर अडचणी निर्माण होवून अन्य वाहनधारकांना ये-जा करताना समस्यांचा सामना करावा लागत आहे. विजयनगर, समर्थनगर, लक्ष्मीनगर, विनायकनगर, गणेशपूर अशा विविध ठिकाणी असलेल्या बहुमजली संकुलातील वाहने रस्त्यावर पार्क केली जात आहे.
शोभेच्या झाडांच्या कुंडय़ांमुळे वाहतुकीस अडथळा
या ठिकाणी काही बंगलेदेखील उभारण्यात आले आहेत. बंगलेधारकांनी आपल्या जागेभोवती संरक्षक भिंतीचे बांधकाम केले आहे. तसेच रस्त्यावर अतिक्रमण करून शोभेची झाडे लावली आहेत. काही बंगलेधारकांनी तर रस्त्यावर शोभेच्या झाडांच्या कुंडय़ा ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे. या प्रकाराकडे हिंडलगा आणि बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. एकीकडे अनधिकृत बांधकाम करायचे आणि दुसरीकडे रस्त्यावरदेखील अतिक्रमण करून सर्वसामान्य नागरिकांना आणि वाहनधारकांना वेठीस धरण्याचा प्रकार बहुमजली इमारत धारकांनी चालविला आहे. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी कार्यालय सोडून ग्राम पंचायतीच्या कारभाराची पाहणी करावी व निर्माण होणाऱया समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.