अभयारण्य प्रशासन, प्रादेशिक वनविभागाला माहितीच नाही
देवराष्ट्रे वार्ताहर
यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्याच्या आतमध्ये एका हरिणाचा तर अभयारण्याबाहेर दुसर्या हरणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी निदर्शनास आली. अभयारण्याच्या कार्यालयापासुन अगदी हाकेच्या अंतरावर हरिण मृत्यूमुखी पडले असतानाही याबाबत अभयारण्य प्रशासन अथवा प्रादेशिक वनविभागाला याची पुसटशीही कल्पना नव्हती.
सागरेश्वर अभयारण्यात हरिणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अभयारण्याचे कुंपन अभयारण्याच्या प्रवेशद्वारासमोरच असलेल्या तळ्यात तुटलेले आहे. दोनशे ते तीनशे फुट सलग कुंपन तुटलेले असल्याने यातुन वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात चार्याच्या शोधात बाहेर पडत आहेत. तर तुटलेल्या कुंपनातुन मोकाट कुत्रीही अभयारण्यात प्रवेश करत आहेत. यामुळे अनेक हरणे मोकाट कुत्र्यांना बळी पडत आहेत. मंगळवारी अभयारण्याच्या आतमध्ये एक हरिण मृत्यूमुखी पडल्याचे दिसुन आले. हे हरिण कुजलेल्या अवस्थेत होते, तर देवतळे परिसरात अभयारण्याबाहेर दुसरे हरिण मृत्यूमुखी पडले होते. याबाबत प्रादेशिक वनविभाग अथवा अभयारण्य प्रशासनाला कोणतीच माहीती नव्हती. वनविभागाच्या निष्काळजीपणाने अनेक हरिणे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बळी पडत आहेत.