गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा, इतरही अनेक आश्वासने
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
काँग्रेस पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यास दहा लाख रोजगारांची निर्मिती केली जाईल. त्याचप्रमाणे स्वयंपाकाच्या गॅसचा सिलिंडर 500 रुपयांमध्ये उपलब्ध केला जाईल. याशिवाय बेरोजगारांना प्रत्येकी महिना 3 हजार रुपयांचा बेकारी भत्ता दिला जाणार असून इतरही अनेक आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे.
या जाहीरनाम्याचे प्रकाशन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुजरातमधील आणि देशातील ज्ये÷ काँग्रेस नेत्यांची उपस्थिती होती. अहमदाबाद येथील काँग्रेसच्या मुख्यालयात जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. गुजरातमध्ये डिसेंबरच्या 1 आणि 5 या दिवशी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मतगणना 8 डिसेंबरला होणार आहे.
रोजगाराच्या आश्वासनासह दहा लाख रुपयांपर्यंत विनामूल्य वैद्यकीय सेवा, दिव्यांगांसाठी महिना 2 हजार रुपयांचे निवृत्तीवेतन, विधवा, ज्ये÷ नागरिक आणि गरजवंत महिलांसाठी महिना 2 हजाराचा भत्ता, 300 युनिट्सपर्यंत वीज प्रत्येक घरासाठी विनामूल्य, सर्व मच्छीमारांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी इत्यादी अनेक आश्वासने या जाहीरनाम्यामध्ये नागरिकांना देण्यात आली आहेत.
नागरिकांच्या इच्छेचे प्रतिबिंब
जाहीरनामा तयार करण्यापूर्वी गुजरातमधील 65 लाखांहून अधिक नागरिकांशी संपर्क करण्यात आला. त्यांच्या इच्छा आणि आकांक्षांचे प्रतिबिंब या जाहीरनाम्यामध्ये उमटले आहे, असा दावा गुजरात काँग्रेस जाहीरनामा समितीचे प्रमुख दीपक बवारिया यांनी पत्रकारांशी बोलताना केला. युवकांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी काँग्रेस कटिबद्ध राहील, असेही सांगण्यात आले आहे.
आश्वासनांचा पाऊस
वरील आश्वासनांखेरीज कोरोनापीडित परिवारांना 4 लाखांची नुकसानभरपाई, केजीपासून पीजीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण, 3 हजार सरकारी इंग्रजी माध्यम शाळांची स्थापना, इंदिरा रसोई योजनेंतर्गत आठ रुपयांमध्ये भरपेट जेवण, दूध उत्पादकांना प्रतिलिटर 5 रुपयांचे अनुदान, मूत्रपिंड, यकृत आणि हृदय यांचे प्रत्यारोपण विनामूल्य अशी ही आश्वासने जाहीरनाम्यात आहेत.
आयोग स्थापन करणार
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सूचना केल्याप्रमाणे या जाहीरनाम्याचे क्रियांन्वयन करण्यासाठी सरकार स्थापन झाल्याबरोबर त्वरित एका आयोगाची स्थापना करण्यात येईल. या आयोगाकडे क्रियांन्वयनावर लक्ष ठेवण्याचे उत्तरदायित्व सोपविण्यात येईल. जाहीरनामा लागू करताना कोणतीही हयगय केली जाणार नाही. जाहीरनाम्याचे सरकारी कागदपत्रात रूपांतर केले जाईल. या जाहीरनाम्याचे पावित्र्य कोठेही बाधित होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल. जनतेचा विश्वास हेच आमचे ध्येय असेल, असेही जाहीरनामा समितीने स्पष्ट केले आहे.
गायींचे संरक्षण करणार
गाय आणि गोवंशाच्या संरक्षणासाठी एक हजार कोटी रुपयांचा विशेष निधी राखीव ठेवला जाईल. पांजरपोळ निर्माण केले जातील. गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला जाईल. गायी पाळणाऱयांनाही साहाय्य देण्यासाठी योजना आखली जाईल, असे आश्वासन गोवंशासंबंधी देण्यात आले आहे.