चिपसह अनेक प्रश्न उपस्थित : निवडणूक आयोगाकडे शंका निरसनाची मागणी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
ईव्हीएमबाबत विरोधी पक्ष पुन्हा एकदा नवी आघाडी उघडण्याच्या तयारीत आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रणनीती आखत त्यांनी समविचारी विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणले. या बैठकीत निवडणूक आयोग आणि न्यायालय पातळीवर ईव्हीएमचा मुद्दा कसा मांडावा यावर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीअंती उपस्थितांनी विविध प्रश्न उपस्थित केले असून निवडणूक आयोगाने आमच्या शंका दूर कराव्यात, असे आवाहन शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुऊवारी राजधानीत त्यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (ईव्हीएम) मुद्यावर सर्व नेत्यांनी आपले म्हणणे मांडले. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, राज्यसभा खासदार कपिल सिब्बल, डावे नेते डी राजा, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत तज्ञांच्या मते कोणतीही चिप असलेली मशीन सहजपणे हॅक केली जाऊ शकते, असे मत शरद पवार यांनी मांडले. आपण आयटी तज्ञ आणि क्रिप्टोग्राफरचे मतदेखील जाणून घेतले पाहिजे, असे ते म्हणाले. विरोधी पक्षांच्या नेत्यांना मतदानाच्या वेळी चिपच्या माध्यमातून मशीनमध्ये छेडछाड होण्याचा संशय आहे. या मागण्यांच्या माध्यमातून निवडणूक पारदर्शक व्हावी, अशी मागणी ते आयोगाकडे करणार असून, या धर्तीवर न्यायालयातही जाणार आहेत.
देशातील सर्व विरोधी पक्ष ईव्हीएमने निवडणुका घेण्याच्या विरोधात आहेत. या मशीनमध्ये अनेक त्रुटी आहेत. पूर्वी निवडणूक आयोग हे एक स्वतंत्र मशीन असल्याचे म्हणत होते. पण आता ते स्वतंत्र मशीन नसल्याचे स्पष्ट होत आहे. या मशीनमध्ये उमेदवाराचे नाव आणि निवडणूक चिन्ह इंटरनेटवरून टाकले जाते, असे मत दिग्विजय सिंग यांनी बैठकीनंतर मांडले. त्यांनी ईव्हीएमच्या चिपवरही प्रश्न उपस्थित केले. ईव्हीएममध्ये वापरण्यात येणारी चिप एकदाच प्रोग्राम केली जाऊ शकते, ती पुन्हा वापरली जाऊ शकत नाही, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले होते. पण आता ईव्हीएम चिप्स मल्टी-प्रोग्रामेबल असल्याचे आयोगाने मान्य केल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. रिमोट ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यामध्ये जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी ईव्हीएमने निवडणुका घेण्यावर आपली असहमती व्यक्त केली होती. आयोगाला प्रेझेंटेशन द्यायचे होते, पण देशात ईव्हीएमबाबत शंका असल्याचे सांगत विरोधी पक्षांनी ते पाहण्यास नकार दिला. निवडणूक आयोगाने आमच्या शंका दूर कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
पवारांच्या सभेपासून तृणमूल काँग्रेस दूर
शरद पवार यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना आपल्या दिल्लीतील घरी बोलावले होते. या बैठकीत ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस यात सहभागी झाला नाही. तृणमूल काँग्रेसने गेल्या आठवड्यातच काँग्रेस आणि भाजपविरोधात नवी आघाडी स्थापन केली आहे. सध्या यात फक्त समाजवादी पक्षाचा समावेश आहे.