ऑनलाईन टीम/तरुण भारत
मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने शिवसेनेत भूकंप झाला आहे. शिंदे यांनी माझ्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा केला आहे. या सगळ्या बंडखोरीबाबत जेव्हा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी शिवसेनेच्या आमदारांचं अपहरण केल्याचा आरोप भाजपवर केला आहे. एवढंच नाही तर एक आमदार कसा पळून आला ते देखील सांगितलं आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांना कशा पद्धतीने गुजरातला नेले याचा घटनाक्रम आता समोर येत आहे. शिंदेनी आममदार डॉ.तानाजी सावंत आणि उस्मानाबादचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनाही सोबत नेले आहे. यावेळी उस्मानाबाद कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील (Kailas Ghadge Patil) यांना इतर आमदारांसोबत वाहनात बसवण्यात आले, मात्र हा बंडखोरीचा प्रकार असल्याची कुनकुन लागताच ते समयसूचकता दाखवत शिंदेंच्या गळातून कसेबसे सुटले. यावेळी गुजरात सीमेपासून म्हणजे मुंबईपासून सुमारे १५० किलोमीटरचे अंतर पार करून त्यांनी कशीबशी मुंबई गाठली. यानंतर मातोश्री गाठून त्यांनी आपल्यासोबत घडलेला थरारक प्रसंग पक्षनेतृत्त्वाला सांगितला आहे. यात कधी दुचाकी, तर कधी भरपावसात ते ट्रकमध्ये बसून त्यांनी दहिसरपर्यंत प्रवास केला.
काय म्हणाले संजय राऊत?
सोमवारी विधान परिषदेचं मतदान पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेतल्या काही नेत्यांनी डिनरसाठी ठाण्याला जायचं असं आमदारांना सांगितलं. यानंतर संध्याकाळी विविध वाहनांमध्ये बसवून ठाण्याच्या दिशेने नेण्यात आलं. ठाणे ओलांडून गेल्यानंतरही वाहनं थांबत नव्हती. पुढे एकनाथ शिंदे आहेत त्यांना भेटून पुढे जायचं आहे असं या सगळ्यांना सांगण्यात आलं. ही सगळी वाहनं महाराष्ट्र गुजरात सीमेवर थांबवण्यात आली.
यावेळी कैलास पाटील यांच्या मनात पाल चुकचुकल्याने त्यांनी लघुशंकेचा बहाणा केला. अंधारात कुणालाही दिसणार नाही या पद्धतीने महाराष्ट्राच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला. अंधाराचा रस्ता, पाऊस या सगळ्यात चार किमी भिजत चालत जाऊन त्यांनी हे अंतर कापलं. समोरच्या रस्त्यावरून येणाऱ्या एका दुचाकीची लिफ्ट घेतली. दुचाकीस्वार गाव आल्याने थांबला त्यानंतर कैलास पाटील यांनी पुन्हा पायी प्रवास सुरू केला. एका ट्रकला लिफ्ट मागून ते दहीसरला पोहचले. त्यानंतर आपल्या वाहनाने त्यांनी वर्षा बंगला गाठला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे.