पोलिसांकडून शोध सुरु, एकसरच्या पाच युवकांना वाचवण्यात यश
प्रतिनिधी/ दापोली
कोजागिरी पौर्णिमा समुद्र किनारी साजरी करण्यासाठी वाई तालुक्यातील एकसर येथील पाच जण आणि महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील एक जण असे सहा जण गेले होते. समुद्रात पोहण्यासाठी उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात ओढले जाऊ लागले. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी दोर टाकून त्यातील पाच जणांना वाचवण्यात यश आले. परंतु पाचगणी येथील सौरभ धाडवे हा बेपत्ता झाला असून त्याचा शोध सुरु आहे. सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.
मिळालेली माहिती अशी, कार्तिक घाडगे (वय 20), यश घाडगे (वय 19), दिनेश चव्हाण (वय 20), अक्षय शेलार (वय 19), कुणाल घाडगे (वय 30 सर्व रा, एकसर ता. वाई, जि. सातारा), सौरभ धाडवे (वय 18 रा. पाचगणी, महाबळेश्वर) असे सहा जण कर्दे येथे दुचाकी घेऊन गेलेले होते. त्यांनी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास किनाऱयाला टेंट उभारला व आपले साहित्य त्यात ठेवले आणि ते सहाही जण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. त्यावेळी समुद्रला ओहोटी होती. तसेच चाळणं होती. त्यामुळे पायाखालची वाळू निसटली आणि ते समुद्रात जाऊ लागले. त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी समोरच्या हॉटेलमध्ये असलेले ओंकार नरवणकर व मकरंद तोडणकर यांनी त्यांचा आवाज ऐकला आणि ते दोरी घेऊन धावत गेले. त्यावेळी त्यांनी दोरी समुद्रतात फेकली आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सरपंच सचिन तोडणकर यांनी लाईफ जॅकेट आणले. दोरीच्या साहाय्याने त्यात पाच जणांना वाचवण्यात यश आले. मात्र सौरभ धाडवे (वय 18) याचा हात सुटला आणि तो समुद्रत ओढला गेला. काही क्षणातच दिसेनासा झाला. आणि त्याच्यासोबत असलेल्या पाच जणांच्या चेहऱयावरचा आनंद मावळला.
याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, हर्णेचे बिट अंमलदार दीपक गोरे, कॉन्स्टेबल मोहिते आदी पोलीस अधिकारी, महसुल अधिकारी, पोलीस पाटील सोनल खामकर हे घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेची माहिती घेतली. या समुद्रात बुडालेल्या युवकाचा शोध पोलीस घेत आहेत.