भारताने ऐकवली मुख्य सूत्रधाराची ऑडिओ क्लिप ः साजिद मीर मुंबईतील हल्ल्याचा ‘मास्टरमाइंड’
पाकिस्तानी दहशतवाद्यांचा 2008साली मुंबईत भीषण हल्ला
मुंबई / वृत्तसंस्था
मुंबईत 2008 साली झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला पुढील महिन्यात चौदा वर्षे पूर्ण होत असतानाच भारताने हल्ला झालेल्या ताज हॉटेलमध्ये युएनएससीची बैठक आयोजित करून पाकिस्तानच्या कारनाम्यांचा पर्दाफाश केला. पाकिस्तानात बसून दहशतवाद्यांचे सूत्रधार मुंबई हल्ल्याचा कट कसा रचत होते आणि त्यांनी भारतात घुसलेल्या सहकाऱयांना आदेश देऊन हा हल्ला कसा घडवून आणला यासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेसमोर एक ऑडिओ क्लिप सादर केली आहे.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचे कनेक्शन आंतरराष्ट्रीय समुदायासमोर उघड केले. हल्ला करण्यासंबंधीचे आदेश दुसरा कोणी देत नसून मुख्य सूत्रधार साजिद मीर देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी समुद्रमार्गे झालेल्या हल्ल्यादरम्यान पाकिस्तानात बसून मुंबईत आलेल्या 10 दहशतवाद्यांना फोनवर साजिद मीर मार्गदर्शन करत होता. यापूर्वी त्याचा सहभाग उघड झाला आहे. तरीही मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानचा खोटारडेपणा आज पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी समितीसमोर मांडण्यात आला. युएनएससी बैठकीच्या माध्यमातून पाकिस्तानच्या कुरापती संपूर्ण जगासमोर उघड करण्यात भारत यशस्वी झाला आहे.
युएनएससीच्या बैठकीत ऐकविण्यात आलेली ऑडिओ क्लिप मुंबईतील छाबाद हाऊसमधील आहे. त्यामध्ये ‘तिकडे बघा लोकांची हालचाल. एखादी व्यक्ती छतावरून चालत असेल किंवा कोणी येत असेल किंवा जात असेल तर त्याच्यावर हल्ला चढवा’ असे निर्देश साजिद मीर दहशतवाद्यांना देत असतानाचे भाष्य नमूद आहे.
…हा हल्ला संपूर्ण जगावर ः परराष्ट्रमंत्री
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आयोजित बैठकीत सहभागी झाले होते. याप्रसंगी त्यांनी 26/11 चा दहशतवादी हल्ला केवळ मुंबईवरच नाही तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायावर झाल्याचे बैठकीमध्ये स्पष्ट केले. या हल्ल्याचा हिशेब अद्याप पूर्ण झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले. हल्ल्याशी संबंधित कटकारस्थानाची पाळेमुळे उखडून काढणे आणि अन्य गुन्हेगारांना शिक्षा देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही ते पुढे म्हणाले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या व्यतिरिक्त ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स चतुराई, घानाचे परराष्ट्र मंत्री, यूएईचे गृहमंत्री यांच्यासह इतर देशांचे प्रतिनिधी मुंबईत सुरू असलेल्या या बैठकीत सहभागी झाले होते.
‘26/11’ची ती काळी रात्र
26 नोव्हेंबरच्या त्या काळोख्या रात्रीच्या जखमा आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. समुद्रमार्गे 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेल, नरिमन हाऊस, ओबेरॉय हॉटेलसह मुंबईच्या रस्त्यांवर गोळीबार करत हैदोस माजवला. या हल्ल्यात दक्षिण मुंबईला एकप्रकारे ओलीस ठेवले. हॉटेलमध्ये अडकलेले लोक त्या काळोख्या रात्री भयभीत झाले होते. नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी आणि अजमल कसाबला पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांना 4 दिवस लागले. या हल्ल्यात 160 हून अधिक लोक ठार झाले होते. तसेच कसाब वगळता नऊ दहशतवादी मारले गेले. या हल्ल्यात मुंबई पोलिसांचे अनेक उच्चपदस्थ अधिकारीही हुतात्मा झाले होते.
भारत-अमेरिकेसाठी साजिद मीर ‘मोस्ट वॉन्टेड’
साजिद मीर मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. अमेरिकन तपास संस्था ‘एफबीआय’ने यापूर्वीच त्याला मोस्ट वाँटेड दहशतवादी घोषित केले आहे. एफबीआयने मीरला अटक करण्यासाठी आणि सिद्ध करण्यासाठी आवश्यक माहिती देणाऱयास 5 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीसही जाहीर केले आहे. तो भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत आहे. अमेरिका आणि भारत गेल्या एक दशकापासून या दहशतवाद्याचा शोध घेत आहेत. तो लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईदचाही निकटवर्तीय मानला जातो. तसेच तो 2010 पर्यंत झकी-उर-रहमान लख्वीच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होता.