सरकारने धोरण स्पष्ट करावे-पालक संघाच्या बैठकीत मागणी
वार्ताहर /सावईवेरे
सरकारच्या एक शिक्षकी प्राथमिक शाळांच्या विलनीकरणच्या निर्णयाचा वळवई येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या पालकांनी निषेध केला असून विलनीकरणास तीव्र विरोध दर्शविला आहे. उमेश कामत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या पालक शिक्षक संघाच्या बैठकीत सदर निषेधाचा ठराव घेण्यात आला.
विलनीकरण झाल्यास मुलांच्या शिक्षणावर परिणाम होण्य़ाची भिती पालकांनी व्यक्त केली. गावातील ग्रामस्थ व पालक यांना विश्वासात न घेता जो सरकारने निर्णय घेतलेला आहे तो अंत्यत चुकीचा असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे. मुलांना दूरवर दुसऱया शाळेत जाण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. पालकांनासुद्धा यासंदर्भात तेंड द्यावे लागणार आहे. शाळा विलनीकरण करण्यास केवळ पालकच नव्हे तर ग्रामस्थांनासुद्धा विश्वासात घेतले पाहिजे. विलनीकरण झाल्यास प्रवासाची सोय कशी काय असेल. विलनीकरणाची संपुर्ण माहिती शिक्षण खात्याच्या अधिकाऱयांनी पालकांनी लिखीत स्वरूपात द्यावी. मगच पालक निर्णय घेतील असे बैठकीत ठरले.
सद्या या प्राथमिक शाळेमध्ये 7 मुले शिक्षण घेत आहेत. या विद्यालयाच्या एका खोलीत अंगणवाडी असून यात 13 मुले शिकत आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी प्राथमिक शाळेची पटसंख्या वाढण्याची शक्यता आहे. या विद्यालयात लहान सभागृह असून शाळेची वास्तूही मोठी व सुंदर आहे. या शाळेला काही वर्षापुर्वी सरकारतर्फे स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा पुरस्कारही प्राप्त झाला होता. शाळा विलनीकरण झाल्यास ही वास्तू विनावापर पडून राहील व सडून जाण्याची भिती काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे शिक्षण खात्याने विचार करूनच पालकांना विश्वासात घेऊन योग्य निर्णय घ्यावा.