पुणे / प्रतिनिधी :
पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अधिक महिन्यामुळे दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर पालखी प्रस्थान होत असल्याने उन्हाचा त्रास वारकऱ्यांना होऊ नये, यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी, पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
विधान भवन पुणे येथे झालेल्या आषाढी वारी पालखी सोहळा-2023 पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. दूरदृष्यप्रणालीद्वारे महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. बैठकीस आमदार दत्तात्रय भरणे, संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पालखी सोहळय़ाचे प्रमुख आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, पालखी प्रस्थान लवकर होणार असल्याने उन्हाळय़ाचा त्रास होऊ शकतो. यासाठी पुरेसा ओआरएसचा साठा, औषधे, पिण्याच्या पाण्याचे अधिकाधिक टँकर ठेवावेत. पाण्याच्या स्रोतांची, पाण्याची वेळोवेळी तपासणी करावी, रुग्णवाहिका वाढवाव्यात. आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व पथके, यंत्रणा सज्ज ठेवाव्यात. पुणे शहरात महानगरपालिकेने पालखीच्या मार्गावर प्रत्येक एक किमी अंतरावर पाणी, आरोग्य पथक, शौचालयांची व्यवस्था आदींसाठी मंडप टाकण्याचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागातही पालखी तळ आणि विसाव्यादरम्यान अशी व्यवस्था करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत.
मार्गावरील गावांना लवकरात लवकर अनुदान देणार
आळंदी, देहू, सासवड आदी ठिकाणी पालखीप्रस्थानापूर्वी मुक्कामास येणाऱ्या वारकऱ्यांना मूलभूत सोयीसुविधा पुरवाव्यात. पालखीच्या अनुषंगाने पालखी मुक्काम, विसावा आणि मार्गावरील गावांना देण्यात येणारे अनुदान लवकरात लवकर देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. तोपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वा जिल्हा परिषदेने निधी देण्याच्या अनुषंगाने पर्याय तपासून कार्यवाही करावी. तसेच ज्ञानोबा, तुकोबांसह अन्य सर्व पालख्यांच्या मार्गावरील रस्त्यांचे खड्डे बुजविण्यासह इतर कामे करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या.
परदेशी पाहुण्यांनी वारी अनुभवण्याची संधी
जी-20 परिषदेअंतर्गत ‘डिजिटल इकॉनॉमी’ गटाची बैठक 11 ते 13 जूनदरम्यान पुणे येथे होत असून या कालवधीत पालख्या पुणे येथे मुक्कामी आहेत. या वेळी जी-20 बैठकीसाठी 25 देशांचे प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. दोन्हींच्या अनुषंगाने पोलिसांकडून काटेकोर सुरक्षा व्यवस्था करण्यात येत असून परदेशी पाहुण्यांना आपल्या वारीच्या समृद्ध परंपरेचे, संस्कृतीचे दर्शन घडविण्याची संधी असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पुणे जिह्यात तयारी अंतिम टप्प्यात
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी पुणे जिल्ह्यात केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. सासवड येथील कऱ्हा नदीवरील पूलाचे काम झाले असून पोहोच रस्त्याचे काम गतीने सुरू आहे. 5 जूनपूर्वी हे काम पूर्ण होऊन यावर्षी पालखी पुलावरुन जाईल. जेजुरी पालखी तळाच्या विकासाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. दिवे घाटाची चढण झाल्यानंतर भाविकांना त्रास होऊ शकतो, हे लक्षात घेऊन झेंडेवाडी घाटात 10 खाटांच्या विशेष आंतररुग्ण कक्षाची स्थापना करण्यात येणार असून, कार्डियाक रुग्णवाहिका ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.