ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजपने मनुस्मृती सोडली तर आम्ही भाजपसोबत जायला तयार आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी केले होते. त्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrakant Bawankule) यांनी आंबेडकर यांच्यावर टीकास्त्र डागले. प्रकाश आंबेडकर मनुस्मृतीविषयी बोलतात यावरून समजतं की ते किती लहान डोक्याचे आहेत. भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेलं शासन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. भाजपामध्ये सर्वाधिक आदिवासी आणि मागास वर्गांचे कार्यकर्ते आहेत. हे त्यांना कळत नसेल तर त्यांच्याविषयी काय बोलणार? अशा शब्दात आंबेडकर यांचा त्यांनी समाचार घेतला.
बावनकुळे म्हणाले, किंचित सेना आणि वंचित सेना एकत्र आली आहे. पण या दोघांचं एकत्र येणं महाविकास आघाडीला मान्य नाही. कितीही सेना एकत्र आल्या तरीही आम्हाला काही अडचण नाही. महाविकास आघाडीला आम्ही टक्कर देऊ शकतो. भाजपचे सर्वात जास्त काम आदिवासी क्षेत्रांमध्ये आहे. मागास वर्गातील अनेक कार्यकर्तेही भाजपात आहेत, तरीही प्रकाश आंबेडकर मनुस्मृतीविषयी बोलतात. त्यावरुन हे समजते की, ते किती लहान डोक्याचे आहेत.
अधिक वाचा : बोगस इंटरनॅशनल स्कूलच्या प्रमाणपत्रावर सौरभ राव यांची सही; पुण्यात खळबळ
काँग्रेसने स्वत:च्या स्वार्थासाठी अनेकवेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान तोडले. मोदींनी बाबासाहेबांच्या संविधानाच्या कुठल्याही कलमात सुधारणा केली नाही. आंबेडकरांचा विचार नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस पुढे नेत आहेत. हा विचार प्रकाश आंबेडकरांनी करायला हवा.