द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार, संबंध दृढतेच्या दिशेने दोन्ही देश प्रयत्नशील
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या 4 दिवसांच्या भारत र्दाऱयाला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. या दौऱयात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असून द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात चर्चा होणार आहे. आतापर्यंतच्या संबंधांचा आढावाही त्या घेणार आहेत. भारत हा बांगला देशचा सर्वकालीन आणि काळाच्या कसोटीवर उतरलेला मित्र देश आहे, असे विधान त्यांनी हा दौरा सुरु होण्यापूर्वीच आवर्जून केले होते.
नद्यांच्या पाणीवाटपाचा प्रश्न हा दोन्ही देशांमधील सर्वात कळीचा आणि मतभेदांचा मुद्दा आहे. त्यावर या दौऱयात सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. विशेषतः भारतातून बांगला देशात वाहणाऱया तीस्ता नदीच्या पाणीवाटपाच्या प्रश्नावरुन दोन्ही देशांमध्ये अनेकदा नाराजी निर्माण झाली आहे. या प्रश्नावर स्थायी स्वरुपाचा तोडगा काढण्याचा प्रयत्न दोन्ही देश गेली चार दशके करीत आहेत.
तीस्ता ही मोठी नदी
तीस्ता नदी पश्चिम बंगालमधून वाहत जाऊन बांगला देशात ब्रम्हपुत्रा नदीला मिळते. या नदीचा जलौघ विस्तृत असल्याने मोठय़ा प्रमाणात भारताचे पाणी बांगला देशला मिळते. या नदीच्या पाण्याचा किती वाटा कोणत्या देशाला मिळावा, यावर गेली अनेक वर्षे वाटाघाटी सुरु आहेत. 2011 मध्ये दोन्ही देशांमध्ये जलवितरण करार झाला आहे. त्यावेळी मनमोहनसिंग पंतप्रधान होते.
आज पंतप्रधान मोदींना भेटणार
शेख हसीना या आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रोहिंग्यांचा प्रश्न हा देखील महत्वाचा असून त्यासंबंधात चर्चा होणार आहे. रोहिंग्या हे म्यानमारमधील मुस्लीम मानले जातात. तथापि, तेथेही ते बांगला देशातून गेल्याने ते मूळचे बांगला देशाचे नागरीक आहेत, असे म्यानमारचे म्हणणे आहे. भारताही लाखोंच्या संख्येने रोहिंग्या मुस्लीम वास्तव्यास असून केंद्र सरकार त्यांची रवानगी म्यानमारमध्ये करण्याच्या तयारीत आहे. रोहिंग्या हे महिला आणि अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे गुन्हे करतात. त्यामुळे त्यांना कोणीही आपल्या देशात घेण्यास तयार नाही, असे विधानही शेख हसीना यांनी या दौऱयापूर्वी केले आहे. त्यामुळे हा प्रश्नही महत्वाचा आहे.
व्यापार आणि गुंतवणूक
दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणुकीसंबंधी चर्चा होऊन काही निश्चित निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बांगला देश हा भारताचा दक्षिण आशियातील सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. या भागीदारीचा त्याला लाभ झाला आहे. बांगला देशची भारताला होणारी निर्यात सध्या 1.28 अब्ज डॉलर्सची आहे. तर भारताकडून बांगला देश करीत असलेली आयात सध्या 8.6 अब्ज डॉलर्सची आहे. दरवर्षी बांगला देशातून भारतात 15 ते 20 लाख लोक वैद्यकीय उपचार, पर्यटन, रोजगार आणि मनोरंजन यासाठी येतात. सध्या व्यापारी समतोल भारताच्या बाजूचा आहे. या विषयावर चर्चा होणार आहे.
सीएए, एनआरसी चर्चेसंबंधी औत्सुक्य
नागरीकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरीक नोंद कायदा यामुळे दोन्ही देशांमध्ये काही मतभेद निर्माण झाले आहेत. ते दूर करण्याचा प्रयत्न या दौऱयात केला जाईल, अशी चर्चा आहे. भारताने या कायद्यांची घोषणा केल्यानंतर बांगला देशच्या मंत्र्यांनी आणि अधिकाऱयांनी भारताचे दौरे रद्द केले होते. एनआरसी हा भारताचा अंतर्गत विषय आहे. मात्र सीएएची आवश्यकता नव्हती, असे मत बांगलादेश सरकारने व्यक्त केले होते.