स्वातंत्र्यवीर सावरकर, रा. स्व. संघासंबंधी विधान
प्रतिनिधी/ बेंगळूर
भारत जोडो यात्रेवेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढय़ातील योगदानावर राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसकडून सावरकरांचा जाणीवपूर्वक अवमान करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.
भारत जोडो यात्रेचा शनिवारी कर्नाटकातील आठवा दिवस होता. तुमकूर जिल्हय़ाच्या तुरुवेकेरे तालुक्यातील अरळीकेरे पाळय़ येथे पदयात्रा पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका करताना, स्वातंत्र्यलढय़ात भाजप कुठेच नव्हता. भाजप ही वस्तूस्थिती नाकारु शकत नाही. सावरकरांना इंग्रजांकडून स्टायपेंड मिळत होती. रा. स्व. संघ ब्रिटिशांच्या बाजूने होते. काँग्रेस नेते देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले आहेत. भाजप पक्ष देश फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवाय देशातील जनतेमध्ये द्वेषभावना निर्माण करीत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचे भाजप नेत्यांनी खंडन केले आहे.
गांधी कुटुंबाकडे रिमोट कंट्रोल असणार नाही
राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपण कोणत्याही कारणास्तव हस्तक्षेप करणार नाही. निवडून येणारा काँग्रेसचा नूतन अध्यक्ष हा गांधी कुटुंबाचा रिमोट कंट्रोल असणार नाही. ते स्वतंत्रपणे कार्यभार सांभाळतील, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी दिले. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेले मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर हे अनुभवी आहेत. नव्याने निवडणून येणारा काँग्रेसचा अध्यक्ष गांधी कुटुंबाच्या दबावाखाली काम करणार नाही, असे ते म्हणाले.
निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरविणार नाही!
काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडण्याची परंपरा नाही. कर्नाटकात पक्ष निवडणुकीत निवडणूक आल्यानंतरच मुख्यमंत्रिपदाविषयी निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी हायकमांडवर दबाव आणणाऱया कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या गटाची निराशा झाली आहे.
पीएफआय बंदीचे समर्थन
केंद्र सरकारने पीएफआय संघटनेवर बंदी घालण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. द्वेषभावना पसरविणाऱया व्यक्ती आणि संघटनेचे आपण कधीही समर्थन करीत नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.