ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यापासून त्यावर वाद सुरू आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपच्या खासदारांनी राज ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला आहे. त्यामुळे मनसे नेत्यांकडून यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. या प्रतिक्रिया अडचणीच्या ठरू शकतात, म्हणून राज ठाकरे यांनी कडक शब्दात मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना केली आहे.
राज ठाकरे यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी…. “माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमलेले आहेत, ते याबाबत बोलतील. इतर कोणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये. तसेच इतर कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कोणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे, तसेच भाषेचे भान राखावे. जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे. जय महाराष्ट्र!” अशा शब्दात राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कडक शब्दात सूचना केल्या आहेत.
उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागा अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा धमकीवजा इशारा दिला आहे. दरम्यान, राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता असल्याने मनसे नेत्यांकडून ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात येणाऱ्या प्रतिक्रिया अडचणीच्या ठरु शकतात, त्यामुळे राज ठाकरेंनी ही सूचना जारी केल्याचे सांगण्यात येते.