वृत्तसंस्था/ बिकानेर
राजस्थानमधील बिकानेर राजघराण्यातील शेवटची राणी आणि राजमाता सुशीला कुमारी यांचे वयाच्या 94 व्या वषी निधन झाले. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आता रविवारी सागर गावात असलेल्या राजघराण्याच्या स्मशानभूमीत सुशीलाकुमारी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शनिवारी त्यांचे पार्थिव जुनागड किल्ल्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राजमाता यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांची नात आणि बिकानेर पूर्व मतदारसंघाच्या आमदार सिद्धी कुमारी रात्री उशिरा रूग्णालयात पोहोचल्या होत्या. रविवारी राजघराण्यातील रीतीरिवाजांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राजमाता गेल्या काही वर्षांपासून आजारी होत्या. आजारपणामुळे त्यांनी लोकांना भेटणे बंद केले होते. त्या आपल्या लाल लालगड येथील निवासस्थानी राहत होत्या. सुशीला कुमारी यांचा जन्म 1929 मध्ये डुंगरपूर राजघराण्यात झाला. त्या राज सिंह डुंगरपूर यांची बहीण होत्या. त्यांचा विवाह बिकानेरच्या राजघराण्यातील करणी सिंह यांच्यासोबत झाला होता. महाराजा सार्दुल सिंह यांचा मुलगा राजकुमार करणी सिंह यांचा राज्याभिषेक 1950 मध्ये झाला होता. करणी सिंह महाराज झाल्यानंतर सुशीलाकुमारी यांनाही राणीचा मान मिळाला होता. 1971 पर्यंत त्या राणी होत्या. 1988 मध्ये महाराजा करणी सिंह यांच्या निधनानंतर सुशीला कुमारी राजघराण्यातील सर्व व्यवस्था सांभाळत होत्या. लोकांनी त्यांना राजमाता म्हणून स्वीकारले होते. करणी सिंह 1952 ते 1977 पर्यंत बिकानेरमधून खासदार होते. आता त्यांची नात सिद्धी कुमारी आमदार आहे.