चंद्रशेखर कोडीहळ्ळी यांचे समर्थकच कारणीभूत असल्याचा टिकैत यांचा आरोप
प्रतिनिधी/ बेंगळूर
आंदोलन थांबविण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपाबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या भारतीय किसान युनियन संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलन थांबविण्यासाठी 3 हजार कोटी रुपयांची मागणी केल्याच्या आरोपाबाबत यापूर्वी वृत्तवाहिनीवर बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या विषयामुळे देशभरात चर्चेला ऊत आला होता. या विषयाचा खुलासा करण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी नेते बेंगळूरला आले होते. तसेच सोमवारी बेंगळुरातील गांधी भवनात पत्रकार परिषद बोलावली होती.
या पत्रकार परिषदेत शेतकरी नेते राकेश टिकैत आणि यदुवीर सिंग यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली आहे. तसेच तेथील काही नागरिकांनी राकेश टिकैत यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. दरम्यान, घटनास्थळी एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या आहेत. अचानक घडलेल्या घटनेमुळे राकेश टिकैत यांनी बोलावलेली पत्रकार परिषद अर्ध्यावरच थांबली.
घटनेबाबत सविस्तर माहिती अशी, कर्नाटकाचे शेतकरी नेते कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी केलेल्या आरोपाबाबत स्पष्टीकरण देताना राकेश टिकैत आणि यदुवीर सिंग यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. पैसे घेतलेल्या प्रकरणात आमचा सहभाग नाही. कोडीहळ्ळी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे टिकैत आणि सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, काहींनी या प्रकरणी वाद घालत त्यांच्यावर शाईफेक केली. नंतर तेथील खुर्च्या फेकण्यात आल्या. कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी हे कृत्य केले आहे, असा आरोप टिकैत यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या नूतन कृषी कायद्याला विरोध दर्शवून केलेल्या आंदोलनात राकेश टिकैत आघाडीवर होते. नंतर सरकारने कृषी कायदे रद्द केले. तसेच उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजपने विजय मिळविला. यावेळी कोडीहळ्ळी चंद्रशेखर आणि राकेश टिकैत यांनी परस्परांविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप केला. कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी केलेल्या आरोपावर उत्तर देताना राकेश टिकैत यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे.
या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना राकेश टिकैत यांनी, अशा पद्धतीची घटना घडायला नको होती. पोलिसांनीही सुरक्षा पुरविली नाही. याचबरोबर या घटनेत राज्य सरकारचाही सहभाग आहे, असा आरोप त्यांनी केला.
शाईफेकप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक
शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाई फेकून हल्ला केल्याप्रकरणी आतापर्यंत तिघा जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी दिली. सोमवारी विधानसौधमध्ये येथे शाईफेक प्रकरणाबाबत बोलताना ते म्हणाले, पत्रकारांनी रागाच्या भरात येऊन टिकैत यांच्यावर शाईफेक केली आहे. ते कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आता तिघांना अटक केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.