जोशीमळा येथील नागरिकांचा संबंधित विभागाला इशारा : दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
प्रतिनिधी / बेळगाव
खासबाग जोशी मळा येथे दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. परिणामी नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
शहरात 24तास योजनेअंतर्गत जलवाहिन्या काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मात्र काही भागात चार दिवस आड पुरवठा करण्यात येणारे पाणी देखील शुद्ध नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. जोशी मळा खासबाग परिसरात जलवाहिनीद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत आवश्यक दुरुस्ती करावी अशी तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. सदर जलवाहिन्या बदलण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. पण याबाबत पाणीपुरवठा विभागाने आणि महापालिकेने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. सध्या विविध रोगराईचा प्रसार वाढत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे सदर समस्येचे निवारण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.