पावसाचा परिणाम, आवक मंदावली, किमती भडकल्या
बेळगाव
मागील काही दिवसांपासून होत असलेल्या वादळी पावसामुळे भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सगळय़ाच भाज्या प्रतिकिलो 40 ते 50 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईत नागरिकांना वाढत्या भाजीपाल्याच्या दराचे चटके सहन करावे लागत आहेत. इंधन दरवाढीमुळे खाद्यतेलांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ भाजीपाला दरात वाढ होत आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात ढबू मिरची 60 रु., काकडी 60 रुपये, भेंडी 40 रु., गवार 80 रु., ओली मिरची 60 रु., बिनिस 100 रु., टोमॅटो 40 रु., वांगी 60 रु., बटाटा 30 रु., दोडकी 60 रु., गाजर 60 रु., कारली 40 रु., कांदे 20 रु. असे प्रतिकिलो भाज्यांचे दर आहेत. तर कोबी 10 रु. एक, फ्लॉवर 20 रु. एक, कांदा पात 20 रु. 4 पेंडय़ा, लालभाजी 15 रु. 2 पेंडय़ा, कोथींबीर 20 रु. पेंडी, मेथी 20 रु. एक पेंडी, पालक 20 रु. 4 पेंडय़ा, शेपू 10 रु. 1 पेंडी अशी भाज्यांची विक्री सुरू आहे.
उष्म्यात वाढ झाल्याने पालेभाज्या आणि फळांना मागणी वाढली आहे. मात्र पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक मंदावली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. विशेषतः मागील आठवडय़ात 15 ते 20 रुपये असणाऱया टोमॅटोचा दर प्रतिकिलो 40 रुपये झाला आहे. याबरोबरच इतर भाज्यांच्या दरातही प्रतिकिलो 15 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे.
10 रुपयाला एक लिंबू
पारा वाढत चालल्याने शरीराची लाहीलाही होत आहे. त्यामुळे शीतपेय आणि रसाळ लिंबूंच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र लिंबूंची आवक कमी असल्याने लिंबूंच्या दरात वाढ झाली आहे. 10 रुपयाला एक लिंबू अशी लिंबूंची विक्री सुरू आहे. मागील काही दिवसांपासून लिंबूच्या दराने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना लिंबू खरेदी करणे कठीण झाले आहे.