कोल्हापूर- ५ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज गुणरत्न सदावर्ते यांना शाहूपुरी पोलिसांनी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टात हजर राहताना सदावर्ते यांनी “बोलो मेरे संग जय हिंद ” चा नारा दिला. दरम्यान सदावर्ते यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे.. त्यांना ऑर्थर जेलमध्ये हलवले जाणार आहे. मात्र २०२० मध्ये सदावर्तेवर दाखल असलेल्या गुन्ह्यात ताबा मिळवण्यासाठी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
मुंबईतील गिरगाव न्यायालयाने सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला होता. सदावर्ते यांना बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे आणि फिर्यादींच्या वतीने वकील शिवाजीराव राणे यांनी कोर्टात बाजू मांडली होती . सदावर्ते यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मात्र न्यायालयाने युक्तीवादानंतर सदावर्ते यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज पाच दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर सकाळी ११ वाजता सदावर्ते यांना शाहूपुरी पोलिसांनी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय येथे हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालय कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदावर्तेंविरोधात कोल्हापूरात तक्रार
कोल्हापुरातील मराठा समाज समन्वय समितीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात वकील सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीवरून कलम १५३ अ अन्वये वकील सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. सदावर्ते यांच्या वक्तव्यांमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन एकोप्याला बाधा येण्याची शक्यता असल्याने ही तक्रार दाखल करण्यात आली. मराठा समाज समन्वय समितीचे दिलीप मधुकर पाटील यांनी ही तक्रार दिली होती.