ऑनलाईन टीम / मुंबई :
कोल्हापूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजीत कदम यांचा दणदणीत पराभव केला. याच पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला. सत्ता येत नसल्याने भाजप वैफल्यग्रस्त झाले आहे. दंगली घडवून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असे राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत म्हणाले, काही लोकांनी भोंगे, हनुमान चालिसाचं घाणेरडं राजकारण सुरु केले. पण, त्यांचा भोंगा वाजलाच नाही. आज लागलेल्या कोल्हापूर विधानसभेच्या निकालात जनतेने भाजपला ठेंगा दाखवला. एमआयएमकडून भाजपजे राजकारण करू इच्छित आहे. त्याचा दाखला कोल्हापूरच्या निवडणुकीत मिळाला. भाजप वैफल्यग्रस्त झाले आहे. सत्ता येत नाही, आमदार फुटत नाही. म्हणून काही लोकांना सुपाऱया दिल्या जात आहेत. राज्यात दंगली घडवण्याचा घाट घातला जात आहे. गुप्तचर यंत्रणांकडून तशी माहिती प्राप्त झाली आहे. दंगली घडवून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.
हिंदुत्त्वाविषयी ते म्हणाले, काही लोक हनुमान चालिसा वाचायला पुण्यात गेले. काहींनी भाढय़ाने हिंदुत्व घेतले. हिंदुत्व कोणाला शिकवताय. भाडय़ानं हिंदुत्व घेणाऱयांनी आम्हाला शिकवू नये. शिवसेना प्रमुखांची कॉपी करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न काहींनी केला. पण लोकं असं स्वीकारत नाहीत, असेही राऊत म्हणाले.