ऑनलाईन टीम / मुंबई :
शनिवारी रात्री राणा दाम्पत्याला भेटून खार पोलीस स्टेशनबाहेर पडताना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला झाला होता. या हल्ल्यात गाडीची काच फुटून सोमय्यांच्या हनुवटीला जखम झाली होती. शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी याच मुद्यावरुन भाजपची खिल्ली उडवली आहे. कोणी एखादा माथेफिरू ओठाखाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, सत्ता गेल्याने भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे भाजप नेत्यांकडून अशा प्रकारची वक्तव्य होत आहेत. न्यायालयं आणि विरोधी पक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणी एखादा माथेफिरू ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करत असेल, तर अशा मूर्खपणाकडे दूर्लक्ष्य केलं पाहिजे. येणाऱ्या 25 वर्षातही त्यांची सत्ता महाराष्ट्रात येणाची शक्यता नाही. यामुळे भाजपने आता फडणवीसांच्या घरी बसून हनुमान चालिसा पठण करावी.
महाराष्ट्रात हिटलरशाही सुरू असल्याचा आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी कायदा सुव्यवस्था कोसळणं काय असतं ते उत्तरप्रदेशात जावून पाहावं. आसाम सरकारने गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी याला केलेल्या अटकेबद्दलही फडणवीस यांनी बोलावे, असेही राऊत म्हणाले.