शिवसेना फुटीचा धक्का शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातही बसला आहे. सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे कोकणातही शिवसेनेत फूट पडली आहे. या फुटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन करीत आहेत. या बंडाचा परिणाम आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांवर होऊ शकतो. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालथ नेमकी काय होणार आहे, याकडे प्रत्येकजण लक्ष ठेवून आहे.
विधान परिषदेची निवडणूक 20 जूनला झाल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले व शिवसेना आमदारांच्या एका गटासह सुरतमार्गे आसाम-गुवाहाटीला पोहोचले. त्यानंतर शिवसेनेचे एक-एक आमदार शिंदे गटात सहभागी होऊ लागले आणि शिवसेनेला गळती लागू लागली. अशा परिस्थितीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातील आमदार पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहतील, असे वाटत असतानाच खेडचे आमदार योगेश कदम यांनी धक्का देत शिंदे गटाला समर्थन दिले. त्यानंतर दीपक केसरकर सुरुवातीला गुवाहाटीला पोहोचले आणि पाठोपाठ उदय सामंत यांनीही गुवाहाटीत जाऊन शिंदेंची गळाभेट घेतली.
शिवसेना आमदारांनी बंड केले, त्यावेळी सुरुवातीला दीपक केसरकर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी होते. शिवसेनेच्या बैठकांमध्ये त्यांचा सहभागही होता. परंतु, भाजपशी संगत करावी, अशी मागणी करीत त्यांनी शिंदेंकडे जाण्याचे संकेत दिले होते. शिवसेनेने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु मला कुणी अडवू शकत नाही, असे सांगत ते गुवाहाटीला पोहोचले आणि शिंदे गटात सामिल झाले. विशेष म्हणजे ते शिंदे गटाचे प्रवक्तेही बनत त्या गटाची बाजू समर्थपणे मांडत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत गेलेले दीपक केसरकर यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना युती सरकारच्या काळात अर्थ व नियोजन राज्यमंत्रीपद मिळाले होते, त्यावेळी फडणवीस यांच्याशी त्यांचे चांगले सुत जुळले होते. त्यामुळे ते जिल्हय़ात निधीही मोठय़ा प्रमाणात आणू शकले होते. चांदा ते बांदा योजनेची जबाबदारीही त्यांच्यावर दिली गेली होती. त्यामुळे केसरकर भाजपसोबत जाऊ शकतील, अशी बऱयाच वेळा चर्चा होत होती. मात्र त्यांचे कट्टर विरोधक असलेले नारायण राणे भाजपमध्ये असल्याने भाजपसोबत न जाता शिवसेनेतच राहिले. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांचा मंत्रिपदाचा पत्ता कट झाला. त्यामुळे ते फार नाराज झाले. केवळ योग्य संधीची वाट बघत होते. ती संधी आता त्यांना मिळाली आणि ते पक्षप्रमुखांच्या विरोधात भूमिका घेत शिंदे गटात सामिल झाले आहेत.
उदय सामंत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहतील, असे वाटत होते. अगदी राजभवनात जाईपर्यंत ते ठाकरे यांच्यासोबत होते. परंतु, तेही जेव्हा गुवाहाटीतील रेडिसन हॉटेलमध्ये पोहोचले, तेव्हा कोकणातील शिवसेनेला धक्का बसला. रत्नागिरीचे आमदार असलेल्या सामंत यांच्यावर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग शिवसेनेची बऱयापैकी मदार होती. रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्गातही शिवसेनेची जिल्हा परिषदेवर सत्ता आणण्याचा त्यांचा मनोदय होता. सिंधुदुर्गातील शिवसेनेला ताकद पुरवण्याचे काम त्यांनी पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात केले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना रत्नागिरीतून मोठे मताधिक्य त्यांनी मिळवून दिले होते. मात्र आता उदय सामंत शिंदे गटात सामिल झाल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
योगेश कदम आणि उदय सामंत यांनी बंडखोरांना साथ देण्याचा निर्णय घेतला व दोघेही गुवाहाटीला पोहोचले आहेत. दापोलीत आमदार समर्थक व विरोधक असे दोन गट आहेत. रत्नागिरी जिल्हय़ात कुठेही हिंसक घटना नाहीत. मात्र आमदारांच्या घर व कार्यालयासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. चिपळूण, देवरुख या ठिकाणी शिवसैनिकांचे मेळावे झाले. सर्व ठिकाणी पक्षनिष्ठा राहण्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातही बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयावर दगडफेक झाल्यानंतर घर व कार्यालयाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर शिवसैनिक उद्धव ठाकरे समर्थनार्थ मेळावे घेत आहेत.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात कोकणातील आमदार सहभागी झाल्यानंतर कोकणातील स्थानिक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले होते. मात्र अपेक्षेप्रमाणे बंडखोर आमदारांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. केसरकर यांच्या सावंतवाडी येथील कार्यालयावर दगडफेकही झाली. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आणि बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ मोर्चेही काढण्यात आले. शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राजीनामे देऊन निवडून येऊन दाखवावे, असे आव्हानही दिले जात आहे.
दीपक केसरकर व उदय सामंत हे आजी-माजी पालकमंत्री शिंदे गटात सामील झालेले असताना वैभव नाईक मात्र शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले आहेत. रत्नागिरीतही राजन साळवी हे उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले आहेत. भास्कर जाधव यांनी सावध पवित्रा घेतला आहे. कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सुरुवातीपासुनच उद्धव ठाकरे यांच्याप्रती निष्ठा जाहीर केली आहे. शेवटचा आमदार राहिला, तरी मी ठाकरे यांच्याच सोबत राहणार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले आहे. खरं तर वैभव नाईक हे सुद्धा काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले आहेत. नारायण राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर राणेंचे कट्टर विरोधक असल्याने त्यांनी काँग्रेस सोडली होती. कदाचित बंडखोरांबरोबर तेही जाऊ शकले असते. परंतु कट्टर विरोधक असलेले नारायण राणे आता भाजपात गेले असल्याने त्यांनी शिवसेनेसोबतच राहून पक्षनिष्ठा ठेवली आहे, असे म्हणता येईल. वैभव नाईक शिवसेनेसोबतच राहिल्याने ते मुंबईतून सिंधुदुर्गात आल्यानंतर त्यांना शिवसैनिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. मिरवणुका काढल्या, शिवसेनेचा वाघ आल्याचे म्हटले. खासदार विनायक राऊत अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. तेही कोकणात येताच त्यांचे जोरदार स्वागत होऊ शकते.
शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यात सत्तासंघर्ष पेटलेला आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती काय होणार, उलथापालथ होणार का, महाविकास आघाडी सरकार जाऊन भाजपाचे सरकार येणार का?, शिंदे गट सत्तेत असणार का? की मध्यावधी निवडणुका लागणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पावसाळी हंगाम सुरू झाल्याने शेतकरी वर्ग शेतीत व्यस्त असला, तरी राज्यातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. सर्वच पक्षातील कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता सावध पवित्र्यात आहे. मात्र या सत्तासंघर्षात अनेक मोठय़ा राजकीय घडामोडी घडणार आहेत. सिंधुदुर्ग व रत्नागिरीचे पालकमंत्री कोण असणार, याकडेही लक्ष आहे. या सर्वांचा परिणाम आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दिसून येऊ शकतो.
कोकणात भाजप व राणे यांच्या विरोधात शिवसेनेने नेहमीच रणनीती आखली. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला खिंडार पडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे वर्चस्व असले, तरी देखील लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये गेल्या काही वर्षांत शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. केंद्रात सत्ता असलेल्या भाजपची ताकद रोखण्यासाठी स्थानिक शिवसेना नेते राज्यातील सत्तेचा वापर करीत होते. आता हीच सत्ता अडचणीत आल्यामुळे शिवसेनेसमोर अस्तित्वाच्या लढाईचे संकट उभे राहिले आहे. या संकटाचे काय परिणाम होतील, हे नेमके समजण्यास आणखी काही दिवस वाट पाहवी लागेल.
खरं तर कोकणने नेहमीच शिवसेनेला साथ दिली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून विकासाबाबत कोकणाला झुकते माप दिले जाते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सिंधुदुर्गात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्यास मंजुरी दिली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी 300 कोटींची सिंधुरत्न समृद्धी योजना मंजूर केली. त्यामुळे कोकणसाठी नेहमीच झुकतं माप देणाऱया शिवसेनेतून गेल्यावर शिंदे गटात गेलेल्या कोकणातील आमदारांना कोकण विकासाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. तरच भविष्यात कोकणी जनता त्यांच्यासोबत राहू शकते.
संदीप गावडे