राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोतांचे वक्तव्य ः धर्माच्या आधारावर समुदायाला लक्ष्य करणे चुकीचे
वृत्तसंस्था / जयपूर
देशाला हादरवून टाकणाऱया श्रद्धा वालकर हत्येप्रकरणावरून आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी वादग्रस्त विधान केले आहे. गेहलोत यांच्या वक्तव्यावर भाजपने जोरदार टीका केली आहे. श्रद्धा वालकरची हत्या ही एक दुर्घटना असून त्याला विनाकारण मोठे स्वरुप देण्यात येत असल्याचे विधान गेहलोत यांनी केले आहे. गेहलोत यांच्या विधानावरून आता राजकारण तापू लागले आहे.
शतकांपासून आंतरधर्मीय विवाह होत आले आहेत, यात कुठलीच नवी बाब नाही. परंतु आता एका समुदायाला, धर्माला लक्ष्य केले गेले असून त्याच्या आधारावर राजकारण होत आहे. धर्म अन् जातीच्या नावावर लोकांना एकत्र करणे, संघटित करणे, जमाव निर्माण करणे सोपे काम आहे. आग लावणे अत्यंत सोपे असले तरी आग विझविण्यास वेळ लागतो. एखादी इमारत तयार करण्यास वेळ लागतो, परंतु तीच इमारत सहजपणे पाडविता येत असल्याचा दावा गेहलोत यांनी केला आहे.
उत्तरप्रदेश निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे गुजरात दौरे वाढले आहेत. पंतप्रधानांची प्रतिष्ठा मेठी असल्याने त्यांनी वारंवार येण्याची काय गरज? त्यांच्या दौऱयातून भाजपची राज्यातील स्थिती कमकुवत असल्याचे निदर्शनास येत असल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केला आहे. गेहलोत हे गुजरातमध्ये काँग्रेसच्या प्रचारासाठी ठाण मांडून आहेत.
दिल्लीतील महरौली भागात श्रद्धा वालकर या युवतीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आफताब पुनावालाने 18 मे रोजी श्रद्धाची गळा दाबून हत्या केली होती. हत्येनंतर आफताबने तिच्या शरीराचे 35 तुकडे करून स्वतःच्या घरात सुमारे तीन आठवडय़ांपर्यंत 300 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवले होते. या तुकडय़ांना तो रात्रीच्या वेळी जंगलामध्ये फेकून येत होता.