म्हापशातीलील 21 तक्रारींसह 23 तक्रारी दाखल : घोटाळय़ाची व्याप्ती पसरलीय संपूर्ण गोव्यात,तक्रारींची संख्या रोज वाढत जाण्याची शक्यता एकच निरीक्षक हाताळतो एसआयटीचे कामकाज
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणी म्हापसा पोलीस स्थानकात यापुर्वीच असलेल्या 21 तक्रारी विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसआयटी अगोदरच तपास करीत असलेल्या दोन तक्रारी आणि म्हापसा पोलिसांकडून आलेल्या या 21 तक्रारी मिळून एकूण 23 तक्रारी झाल्या आहेत. मात्र येत्या काळात तक्रारींची संख्या वाढत जाणार असल्याने एवढय़ा तक्रारींचा तपास करण्यासाठी एसआयटीकडे आवश्यक तेवढा स्टाफ आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष तपास पथकात उपअधीक्षक ब्राझ मिनेझिस, निरीक्षक सतिश गावडे, निरीक्षक आयआरबी नीलेश शिरोडकर, पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी आणि राज्याच्या निबंधकांचा समावेश आहे. म्हणजेच एक अधीक्षक, एक उपअधीक्षक आणि दोन निरीक्षक मिळून एकूण चार पोलीस अधिकाऱयांकडे हे जमीन घोटाळा प्रकरण देण्यात आले आहे. अधीक्षक आणि उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक हा तपास अधिकारी म्हणून काम करीत असतो. दोन निरीक्षकांपैकी एकाने अद्याप एसआटीचा ताबा घेतलेला नाही, त्यामुळे सध्यातरी एकच निरीक्षक हे प्रकरण हाताळत आहे.
आणखी निरीक्षकांची मागणी करणार : वालसन
सीआयडीचे अधीक्षक निधिन वालसन यांना विचारले असता ते म्हणाले की सध्यातरी जे अधिकारी आहेत ते काम करतील, मात्र एसआयटीसाठी आणखी निरीक्षकांची गरज असून त्याची मागणी आपण करणार आहे. राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणाकडे समस्त गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रकरणात कोणकोणत्या आजी, माजी सरकारी अधिकाऱयांचा तसेच अन्य कोणाचा त्यात हात आहे, त्यांची नावे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक गोमंकीयाला आहे.
घोटाळय़ाची व्याप्ती संपूर्ण गोव्यात
अनेक गोमंतकीयांची वडिलोपार्जीत जमीन आजी, माजी सरकारी अधिकाऱयांशी हातमिळवणी करून संशयितांनी हडप केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण व्हावा असे गोमंतकीयांना वाटत आहे. हा घोटाळा शहरापुरता किंवा किनारी भागापुरता मर्यादीत नसून राज्यातील ग्रामीण भागातही लँडमाफियांनी कारनामे केल्याचे उघड होत आहे. जमीन घोटाळा प्रकरणाचे जाळे पसरले आहे.
तक्रारींची संख्या वाढत जाण्याची शक्यता
ग्रामीण भागातून काही ठकबाज लोकांनी सरकारी अधिकाऱयांना हाताशी धरून बनावट सेलडीड करुन 1/14 च्या उताऱयावर आपले नाव घुसविले असल्याचे उघड झाले आहे. ज्यांच्यासोबत अशाप्रकारची फसवणूक झाली आहे तसेच ज्यांच्या जमिनीच्या कागदपत्रावर ठकबाजांनी आपली नाव घुसविली आहेत, ते लोक आता पुढे येऊ लागले आहेत. काही दिवसांनी त्यांच्याही तक्रारी एसआयटीकडे येणार असल्याने एसआयटीवर कामाचा बोजा आखणी वाढणार असल्याने सध्याचा स्टाफ त्यासाठी तोकडा पडणार आहे.