गायक दर्शन रावळ यांचे प्रांजळ मत
बेळगाव : कर्नाटक आणि बेळगावात प्रथमच येण्याचा योग जुळून आला. त्यामुळे येथील अनुभव घेऊनच जाणार आहे. येथील स्थानिक संस्कृती आणि परंपरा मला खूप भावली. अलीकडे फॅशन म्हणून तरुण गायनाकडे वळत आहेत. अशा तरुणांना वेळीच मार्गदर्शन आणि प्रोत्साहन आवश्यक आहे. मी पहिल्यांदा सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियाज रॉ स्टारमध्ये झळकलो आणि तो माझ्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरला, असे प्रांजळपणे गायक, संगीतकार दर्शन रावळ यांनी नमूद केले.
एमईएच इव्हेंट्स प्रस्तुत माणिक विंग्जतर्फे आनंदयात्रीच्या सहकार्याने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी रावळ यांनी दिलखुलास चर्चा केली. लहानपणापासून लेखन, वादन आणि संगीतामध्ये आवड होती. वयाच्या 9 व्या वर्षापासून लहान सहान गाणी गुणगुणत होतो. त्यामुळे पुढे चांगले यश मिळाले. सुरुवातीला इतका मोठा संगीतकार होईन, असे वाटले नव्हते. मात्र, आवड आणि छंद जोपासल्याने भरारी घेता आली. कुटुंबीयांचीही योग्य वेळी साथ मिळाली. गाणी गात असलो तरी जीवनात अजून बरेच काही शिकायचे असल्याचे त्यांनी भावूकपणे सांगितले.
तरुणांनी एकतरी छंद जोपासला पाहिजे. त्यातूनच ऊर्जा प्राप्त होऊन आपण मोठे होऊ शकतो. यु-ट्यूब आणि रिअॅलिटी शोमधून चाहत्यांपर्यंत पोहोचता आले. चाहत्यांनीही पाठबळ दिले आणि इतर थोरांच्या प्रेरणेमुळे संगीत क्षेत्रात काहीतरी करता आल्याचे समाधान वाटते. मला बेस्ट मेल सिंगर पुरस्कार मिळाल्याचे सांगत त्यांनी हिंदी, गुजराती आणि तेलगू गाण्यांची झलक दाखविली. बेळगावमध्ये येऊन नैसर्गिक आनंद लुटता आला. यापूर्वी गायनासाठी दहा देशांतून भ्रमंती केली. भारतातील प्रत्येक शहरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शिवाय या ठिकाणी संस्कृती टिकून असून विविधताही पाहायला मिळते, असे गायिका सियाना कॅथरिन यांनी सांगितले.