अध्याय सविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, मुमुक्षु भक्तांना आत्मप्राप्तीसाठीचे असलेले नियम माहित असणे आवश्यक आहे. त्यामध्ये संगत अत्यंत महत्त्वाची आहे. संगतीचे परिणाम फार दूरगामी असतात. चांगली संगत असेल तर साधकाची हमखास प्रगती होते परंतु दुर्जनाची संगत मात्र नक्कीच अडचणीत आणते. आध्यात्मिकदृष्टय़ा जे लोक कामसेवन आणि उदरभरण यांनी संतुष्ट असतात ते दुर्जन होत असे म्हणायला हरकत नाही. दुर्जन म्हणजे दुष्ट लोक. कारण असे लोक दैवयोगाने मिळालेला अमूल्य असा हा नरदेह वाया घालवतात. याला स्वतःशीच केलेला दुष्टपणा म्हणायचं नाही तर काय? ते स्वतःचा तर घात करून घेतातच आणि भरीला जे त्यांच्या संगतीला लागतात त्यांचीही वाट लावतात. अशा दुर्जनांची संगत कधीही धरू नये कारण त्यांचे अनुकरण करणाऱयांची अधोगतीच होते. समजा दोन आंधळे एकमेकांच्या संगतीने वाटचाल करू लागले, तर ते हमखास खड्डय़ातच पडणार, त्याप्रमाणे कामसेवन आणि उदरभरण यांनी संतुष्ट होणाऱया व्यक्तीबरोबर साधक जाऊ लागला तर त्याची अधोगतीच होणार हे निश्चित असते. म्हणून माणसाने वेळीच सावध व्हावे आणि दुर्जनांची संगत सोडून देऊन संतांची संगत धरावी. साधू म्हणजे ज्याने त्याच्या मनातून काम, क्रोध, मोह, लोभ, मद आणि मत्सर या षड्रिपूना रजा दिलेली आहे अशी व्यक्ती. संत हा खरा साधू असतो. त्याच्या अंतःकरणात रंजल्या गांजल्या लोकांबद्दल असीम करूणा असते. तुकाराम महाराजांनी अशा मृदू अंतःकरणाचे वर्णन करण्यासाठी लोण्याची उपमा वापरलेली आहे. लोणी जसे अंतर्बाह्य मऊच असते तसेच संतांचे अंतःकरण असते. म्हणूनच ज्यांचा कोणीही रक्षण करणारा नसतो त्यांचे रक्षण करण्यासाठी संतपुरुष नेहमीच तत्पर असतो. संतपुरूष हा दयेचा सागरच असतो. ज्या प्रकारची संगत लागेल त्याप्रमाणे मनुष्य वागू लागतो. जर सत्संगतीचा लाभ झाला तर आपणही त्याप्रमाणे वागावे असे त्याला वाटू लागते परंतु जर दुर्जन संगती मिळाली तर वाईट सवयी लागायला वेळ लागत नाही. ज्याप्रमाणे ओढाळ गुरांच्या संगतीत एखादी चांगली गाय क्षणभर जरी गेली, तरी त्या क्षणाच्या संगतीमुळे तिच्यावर ओढाळपणाचा शिक्का बसतो आणि त्याचा परिणाम म्हणून तिला निरंतर लोढणा गळय़ात वागवावा लागतो. त्याप्रमाणे दुर्जनांची संगत क्षणार्धामध्येसुद्धा अनर्थात घालते. म्हणून मुमुक्षूंनी अशा ठिकाणी एक क्षणभरसुद्धा वस्तीला जाऊ नये. लोहाराची भट्टी जशी कोणालाही सहज पोळते, त्याप्रमाणे दुर्जनाची संगत भाविक लोकांना भ्रमात टाकते. चुकून जरी असाधूची संगत घडली तरी विषयासक्ति वाढते आणि आपण करतोय तेच बरोबर असे वाटून अधर्म गोड वाटू लागतो. ज्याप्रमाणे अमावस्येच्या अंधाऱया रात्री आपण कुठे चाललो आहोत हेच समजत नाही त्याप्रमाणे चांगले काय, वाईट काय हे समजेनासे झाले की, ज्ञानाने पाठ फिरवली म्हणून समज! आंधळय़ाने आंधळय़ाच्याच हाताला धरले म्हणजे दोघेही खडय़ात पडतात, त्याप्रमाणे अविवेकाच्या स्थितीमुळे विषयांध लोक ‘अंधतम’ नावाच्या नरकात पडतात. एकूण काय, तर दुःसंगतीच्या सहवासाने नरकवास प्राप्त होतो. पश्चात्ताप झाला तरच त्यातून सुटका होते. त्यासंबंधाने भगवंत उद्धवाला ‘ऐलगीत’ सांगत आहेत. ऐल म्हणायचं कारण म्हणजे पुरुरवा राजाचं एक नाव ऐल असं होतं. पुरुरवा आणि उर्वशीचा कथाप्रसंग सांगताना भगवंत म्हणाले, परम यशस्वी सम्राट पुरूरवा उर्वशीच्या विरहाने वेडापिसा झाला होता पण नंतर शोक आवरल्यावर त्याला प्रबळ वैराग्य आले. त्यामुळे अमुक एक हवे अशी कोणतीही इच्छा त्याला उरली नाही. असं म्हणून भगवंत क्षणभर थांबले. वैराग्याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान अशी वृत्ती झाली की, वैराग्य आले असे समजावे. भगवंत पुढे म्हणाले, थांब तुला मी सर्व कथाप्रसंग सविस्तर सांगतो. ऐक, समुद्रवलयांकित पृथ्वीचे पालन करणारा, सर्व राजांचा मुकुटमणि, पुरूरवा नावाचा चक्रवर्ती राजा होऊन गेला. त्याची कीर्ति पुराणातून प्रसिद्ध आहे. तेज, प्रभाव, महाशौर्य, उचित दातृत्व, गांभीर्य, ख्याती, महती, पराक्रम आणि धार्मिक धैर्य इत्यादि गुणांनी पुरूरवा राजा युक्त होता.