अध्याय एकोणीसावा
उद्धवाला भगवंतांनी तूच ब्रह्म आहेस असे जरी सांगितले असले तरी भगवंतांनी नुसतं सांगून त्याचं समाधान झालं नाही. त्याला ते स्वतःला जाणवून घ्यायचं होतं म्हणजेच त्याला आत्मसाक्षात्कार व्हायला हवा होता. त्यादृष्टीने भगवंतांची भक्ती कशी करावी हे जाणून घ्यायला तो उत्सुक होता. त्याला हे माहीत होते की, ज्ञानाने देव कळतो पण भक्तीने त्याची प्राप्ती होते. म्हणून तो देवाला म्हणाला, तुझी उत्तम भक्ती केली असता त्रिविध तापही क्षयाला जातात आणि मुक्ती आयतीच हाती लागते.
म्हणून मी विनंती करीत आहे की, हे प्रभो ! या घोर संसारमार्गावर मी तिन्ही तापांनी होरपळून अत्यंत दुःखी झालो आहे. अशावेळी आपल्या चरणकमलांना शरण जाण्याखेरीज दुसरा कोणताही उपाय मला दिसत नाही कारण आपले हे चरणकमलच अमृताचा वर्षाव करून शरणागतांना अभय देणारे आहेत.
त्रिविध तापाने जे तापलेले असतात, कामक्रोधांनी ज्यांना जर्जर करून टाकलेले असते, आशेने आणि तृष्णेने जे डबडबलेले असतात आणि जन्ममरणाने गुरफटलेले असतात. संसाराचा अत्यंत बिकट मार्ग दुःखानेही ज्यांना आक्रमण करवत नाही असे जे यातना भोगीत असलेल्याना हरीचे पदकमल हेच एक छत्र आहे. तुझ्या चरणकमलावाचून शरण जाण्याला दुसरे स्थळच दिसत नाही. म्हणून कायावाचामने करून भक्तिभावाने तुलाच मी शरण आलो
आहे.
छत्र केवळ एकच ताप दूर करते पण तुझ्या चरणाचे छत्र काही निराळंच आहे. ते त्रिविध तापांसह सर्व संताप दूर करून जनाला निष्पाप करून सोडते. कोणी आपल्या मनानेच तुला शरण आले, कोणी वैर करूनच तुझ्यामध्ये मिळून गेले.
कोणी भावार्थानंच तुझे भजन केले आणि कोणी भयभीत होऊनच तुझे स्मरण केले, कोणी तुझ्या कुळातील असल्यामुळे सुहृद बनले, कोणी स्नेहामुळेच तुला प्रेमबद्ध झाले, कोणी कामतंत्राने अंगसंग करून उद्धरून गेले, तर कोणी निरंतर आज्ञाधारक सेवकच बनून राहिले. तात्पर्य, अनेक प्रकारांनी विचित्र रीतीने ज्यांनी तुझ्या चरणछत्राचा आश्रय केला, त्यांच्यासमोर संसाराचे भय उभे राहू शकत नाही. भक्त असो, वैरी असो की आप्त असो, त्या साऱयांनाच तू आपले निजपद देतोस. अशी तुझी उदारता फार मोठी आहे. तू सर्वांचा स्वानंदबोध आहेस. होमहवन करून अग्नीला जे अर्पण केले जाते, ते तो अग्नी आपल्यासारखेच करून टाकतो तसेच चुकूनही जरी त्यावर कांही पडले, तरीही त्याची गती तशीच होते. ह्याप्रमाणे श्रीकृष्णा! कोणत्याही प्रकारांनी जे तुझ्यासंबंधांत येतात, त्यांच्या संसाराची पीडा दूर करून समत्वाने तू त्यांना आपल्या पदाला नेतोस. ते तुझे चरणरूप छत्र येथे त्रिविधतापांचे निवारण करून सदासर्वदा परमामृताचा वर्षाव करीत आहे. म्हणूनच त्या चरणांना मी शरण आहे. ज्या संसाराच्या भयाने तुझ्या चरणाला मी शरण आलो आहे, त्या भवभयाचे स्वरूप उद्धव सांगत आहे.
हे महानुभाव ! मी या संसाररूप विहिरीत क्षुद्र विषयरूप पाण्याने सुखोपभोगरूप तहान भागवण्यासाठी आलो व तीत पडलो तेथेच कालरूपी सर्पाने मला दंश केला आता आपणच कृपा करून मला वर काढा आणि मला मुक्त करणाऱया आपल्या अमृतवाणीने ओलाचिंब करून टाका. लोक हे संसाररूप गुहेमध्ये सांपडून गृहदारारूप विहिरीमध्ये पडले आहेत. त्यातही काळरूप सर्पाने कडकडून चावा घेतला आहे. त्या वेदना तर फारच भयंकर आहेत ! त्या काळरूपसर्पाचे विष क्षणोक्षणी चढत आहे तरीही लोक अभिमानाला भुलून विषयसुखाची इच्छा करतातच आहेत.
काळसर्पाचा प्रताप काही विलक्षण आहे. त्याने विषासारखे कडू असलेले विषयही गोड करून सोडले आहेत आणि गोडातला गोड असा जो परमार्थ तो जीवाभावापासून कडू करून सोडला आहे ! विषापेक्षाही विषय भयंकर आहेत. कारण, विष हे एक वेळच मारक असते परंतु विषय हे पुनःपुन्हा घात करीत असतात. इतकी काळसर्पाने लोकांना भुरळ घातली आहे.
क्रमशः