रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱयांची सूचना : नियमांचे काटेकोर पालन करण्यासंबंधी आवश्यक जागृती करण्याचे आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ातील प्रमुख ठिकाणी वाहनांची वर्दळ वाढत आहे. आरटीओ विभागाच्या अधिकाऱयांनी सातत्याने वाहनांची तपासणी करून वाहतूक नियम मोडणाऱया, नियमांपेक्षा अधिक प्रवासी कोंबणाऱया वाहनचालक व मालकांवर कारवाई करावी, अशी सूचना जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली.
शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रस्ते सुरक्षा समिती व परिवहन विभागाची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, रस्ते चांगले आहेत, तरीही अपघात घडत आहेत. ही चांगली गोष्ट नाही. भविष्यात सातत्याने बैठका घेऊन यासंबंधी आढावा घेण्यात येणार आहे. वाहनचालक व मालकांकडून नियमांचे काटेकोर पालन करण्यासंबंधी आवश्यक जागृती करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी केली.
आरटीओ विभागातील अधिकाऱयांनी सातत्याने वाहनांची तपासणी करावी. कर्मचाऱयांची कमतरता किंवा इतर कारणे न सांगता उपलब्ध कर्मचाऱयांना तपासणीसाठी जुंपावे. खास करून शहरी भागात धावणाऱया शाळा, कॉलेजच्या बसेस, ऑटोरिक्षा, कामगारांसाठीची वाहने आदींवर विशेष लक्ष ठेवावे, नियमांचे उल्लंघन करणाऱयांचे परमीट रद्द करावे. विशेष अभियानांतर्गत केलेल्या कारवाईचा अहवाल बैठकीत सादर करावा, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी केली.
जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची पुनर्रचना करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी परवानगी दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंते किंवा कार्यकारी अभियंत्यांना सरकारच्या सूचनेवरून या समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करावी. याबरोबरच वेगवेगळय़ा खात्यांच्या अधिकाऱयांच्या नियुक्तीसाठीही जिल्हाधिकाऱयांनी परवानगी दिली असून राष्ट्रीय महामार्गावर रुग्णवाहिका व गस्तीसाठी वाहने तैनात ठेवणे ही टोल घेणाऱया संस्थेची जबाबदारी आहे. महामार्गावर ट्रक उभी केल्यामुळे अपघात घडत आहेत. म्हणून गस्तीच्या वाहनांतून लक्ष ठेवण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी केली.
या बैठकीत पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी, मनपा आयुक्त डॉ. रुदेश घाळी, स्मार्ट सिटीचे डॉ. प्रवीण बागेवाडी, प्रादेशिक परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम आदींसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
पार्किंगची व्यवस्था करणे सक्तीचे
बेळगाव शहरातील शिक्षण संस्थांनी आपल्या संस्थेच्या आवारात पार्किंगसाठी व्यवस्था करणे सक्तीचे आहे. वर्दळीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी पार्किंग असू नये. अधिकाऱयांनी यासंबंधी आवश्यक कारवाई करावी. खासगी पार्किंगसाठी मनपाच्या अधिकाऱयांनी नियमानुसार परवानगी द्यावी, असेही जिल्हाधिकाऱयांनी बैठकीत सांगितले.