पुणे / प्रतिनिधी :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अतिशय उत्तमपणे काम करणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारला गद्दारांनी गालबोट लावले. त्याचा बदला पोटनिवडणुकीत घ्यायचा आहे. गद्दारांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे, असा घणाघात राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात भाजपचे काहीच अस्तित्व नव्हते. दोन-चार शिवाय भाजपचे नगरसेवक निवडून आले नव्हते. मात्र, फोडाफोडीच्या राजकारणातून भाजपने पक्ष वाढविला. पक्षांतरबंदी कायद्यालाही तिलांजली दिली. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चार उमेदवार निवडून आले. त्यामुळे भाजप-शिंदे गटाला त्यांची ताकद कळाली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. शहरात कोयता गँग आली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांना कारवाई करता येत नाही. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या रॅलीवर दगड मारले. महिला आमदारांवर हल्ला होत आहे. पत्रकाराचा खून केला. याचा जनतेने विचार केला पाहिजे, असेही पवार म्हणाले.
महापालिका निवडणुकीत राजकीय ताकदीप्रमाणे जागा वाटप केले जाईल. पण, आताच्या काळात आपल्या मतांची विभागणी होणे परवडणारे नाही. एक-एक मत महत्त्वाचे आहे. गाफील राहू नका, गैरसमज करू नका. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे जनतेने वेळोवेळी सिद्ध केले आहे. यावेळीही तेच दाखवायचे आहे, असेही पवार म्हणाले. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना राजकारणात मी सगळी ताकद दिली. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, पक्षाचा अध्यक्ष केले. विधानपरिषद, विधानसभेवर अपक्ष निवडून आले. ते आम्हाला सोडून गेले तरी कधी आकस ठेवला नाही. उलट रुग्णालयात दाखल असताना काही लोकांना फोन करुन आवश्यक असलेली इंजेक्शन उपलब्ध करून दिली. त्यातून काही काळ आपला सहकारी आपल्यामध्ये काम करायला लागला, असे अजित पवार यांनी सांगितले. मात्र, भाजपने त्यांच्यासोबत स्वार्थी राजकारण केले, अशी टीका त्यांनी केली.
अधिक वाचा : कसब्यात गडकरी, फडणवीस, शिंदे प्रचाराला येणार
आजारपणातही भाजपाचे स्वार्थी राजकारण
पवार म्हणाले, आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक हे दोघेही गंभीर आजारी असताना भाजपने राज्यसभा आणि विधानपरिषदेचे उमेदवार निवडून आणण्याकरिता रुग्णवाहिका करून त्यांना मुंबईला मतदानासाठी नेले. एवढे काय घडले होते. एक दोन मते कमी झाली असती. तर, काही आकाश पडले नसते. दगदग दोघांना सहन होत नव्हती. पण, पक्षाकरिता गप्प बसले. एवढा मनाचा मोठेपणा, दिलदारपणा या दोन आमदारांनी दाखविला. मात्र, निवडणुकीपेक्षा तुमचा जीव महत्त्वाचा आहे. तुमचे आरोग्य महत्वाचे आहे, हे सांगायला पाहिजे होते. परंतु, स्वार्थी लोकांनी ते सांगितले नाही.