प्रतिनिधी / बेळगाव : शाळेमध्ये कोणत्याही मुलाला दुखापत झाली किंवा रस्ता ओलांडताना अपघात घडला तर प्रथम शिक्षकांना जबाबदार धरले जाते. त्यामुळे आता येळ्ळूर येथील शिवाजी रोडवर असलेल्या शाळांसमोर गतिरोधक बसवावेत, या मागणीसाठी चक्क शिक्षकच आता रस्त्यावर उतरले आहेत. शनिवारची शाळा करून ग्राम पंचायत अध्यक्ष आणि सदस्यांसह या शिक्षकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. काहीही करा मात्र गतिरोधक बसवा, अशी मागणी ग्राम पंचायत सदस्यांनी आणि शिक्षकांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यापूर्वी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी जिल्हा पंचायतीच्या अभियंत्यांना तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना निवेदन दिले. मात्र, त्यांनी कोणतीच दखल घेतली नाहि. वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासनाने दखल घेतली नाही, त्यामुळे आता शिक्षकांनीही गतिरोधक बसवावेत, या मागणीसाठी भर उन्हात उभे राहून जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदूरकर, रमेश मेणसे, दयानंद उघाडे, जोतिबा चौगुले, अरविंद पाटील, राकेश पारिट, परशराम पारिट, शशी धुळजी, राजू डोण्यान्नावर, कल्लाप्पा मेलगे, मुख्याध्यापक बबन कानशिडे, एम. बी. बाचीकर, शिक्षक जे. पी. धामणेकर, एस. बी. मजुकर, एच. एस. लोकळुचे, एम. बी. पवार, एस. बी. मेलगे, के. बी. पोटे, एल. एफ. बस्तवाडकर, एस. एस. बाळेकुंद्री, एम. एन. हंडे, एच. आर. अरेर, एस. बी. दुरुगुडे, प्रशांत सुतार यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.