कंपनीच्या महिला बाउन्सरकडून स्थानिक महिलांना मारहाण
प्रतिनिधी /मोरजी
बागवाडा मोरजी येथील शापोरा नदी किनारी भागातील जमीन एका दिल्लीतील उद्योजकाने विकत घेऊन त्या ठिकाणी हॉटेल उभारण्याची योजना मागच्या 19 वर्षांपासून चालू आहे. आज स्थानिकांच्या घराकडे जाणाऱया पारंपरिक पायवाट अडविण्याचा प्रकार घडल्यामुळे संतप्त नागरिकांनी जमा होऊन जोपर्यंत वाट मोकळी करेपर्यंत जागेवरून हटणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यापूर्वी काही कंपनीच्या महिला बाउन्सरनी स्थानिकांना मारहाण केल्याची तक्रार स्थानिक महिलांनी पेडणे पोलीसांकडे नोंद केली आहे.
दरम्यान, पेडणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत मंडळ घटनास्थळी येऊन योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. परंतु स्थानिक नागरिक आक्रमक होत जोपर्यंत आमच्या पारंपरिक पायवाटेवर टाकलेले दगड आणि पत्र्यांचे घातलेले कंपाऊंड हटवले जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे परिसरातील वातावरण तणावाचे बनले आहे.
सविस्तर माहितीनुसार, बागवाडा मोरजी शापोरा नदीकिनारी स्थानिकांच्या जमिनी दिल्लीतील व्यावसायिकाने एकोणीस वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या आहेत. बागवाडा या भागाची पारंपरिक पंधरा घरे आहेत. स्थानिकांची त्या स्थानिकांना या जमिनीतून पारंपरिक वाट आहे. पारंपरिक वाट मोकळी ठेवण्याचे आश्वासन जमीन मालकाने स्थानिकांना दिले होते. आणि त्यानुसार तीन ते साडेतीन मीटर पायवाट आणि त्या वाटेसाठी मोकळी जागा सोडण्याचे आश्वासन दिले होते. आणि उर्वरित जागेसाठी पत्रे घालण्याचे काम सुरू केले होते. परंतु जी पाय वाट जिथून स्थानिक नागरिक जात होते. त्या ठिकाणीदेखील 22 रोजी कंपनीने एक ट्रक दगड टाकून पूर्ण पायवाट बंद केली होती. याबाबत कंपनीच्या अधिकाऱयांना जाब विचारला असता कंपनीने त्या ठिकाणी महिला बाउन्सर आणल्या. या महिला बाउन्सरनी दोन तीन स्थानिक महिलांना मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे स्थानिक मोठय़ा संख्येने या ठिकाणी जमा झाले व वातावरण संतप्त बनले. तोपर्यंत महिला बाउन्सर आणि कंपनीच्या माणसांनी घटनास्थळावर पलायन केले. त्यानंतर त्या ठिकाणी पेडणे पोलीस उपनिरीक्षक आपल्या फौजफाटय़ासह उपस्थित झाले, शिवाय मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर, उपसरपंच अमित शेटगावकर, पंच सदस्य संपदा शेटगावकर, पंचक पवन मोरजे, पंच प्रकाश शिरोडकर,पंचक उमेश गडेकर , पंच विलास मोरजे, शिवाय नागरीक त्याच प्रमाणे गोवा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबी बागकर,सुधीर कांनायीक, स्थानिक दिलीप बागकर, भक्त दास बागकर, सुधीर कानाईक अमित मोरजे, मच्छींद्रनाथ शेटगावकर आदी मंडळी या ठिकाणी आली.
संतप्त महिलांनी आणि नागरिकांनी यावेळी पंचायत मंडळांना ठणकावून सांगितले जोपर्यंत आमची पायवाट मोकळी होत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून हटणार नाही, असा इशारा दिला त्यानंतर पंचायत मंडळाने संतप्त ग्रामस्थांची चर्चा करून वाट मोकळी करून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो, आणि त्यानुसार पंचायत मंडळ आणि ग्रामस्थांनी मुख्य वाटेवर टाकलेले दगड काढून वाट मोकळी केली.
…तोपर्यंत नाहरकत दाखला नाही!
स्थानिक सरपंच वैशाली शेटगावकर यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जोपर्यंत कंपनी स्थानिकांचा प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत आम्ही कोणतेही नाहरकत दाखले देणार नाही. मागच्या चार दिवसापूर्वी स्थानिक आणि याविरोधात पंचायतीकडे एक निवेदन दिले होते. परंतु कंपनीनेच मधोमध जी पारंपारिक पाय वाट आहे ती पायवाट बंद करण्याचा प्रकार घडल्याने संतप्त नागरिकांनी या ठिकाणी आता आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. पंचायत मंडळाचे स्थानिक ग्रामस्थाना पूर्ण सहकार्य असून ही पायवाट पूर्णपणे मोकळी करण्याची ग्वाही सरपंच वैशाली शेटगावकर यांनी दिली.
…तर कायदा हातात घ्यावा लागेल!
संबंधित पायवाट मोकळी न केल्यास किंवा पुन्हा अडथळे निर्माण केले तर स्थानिकांना हातात कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा दिलीप बागकर यांनी दिला. दरम्यान, ज्यांना मारहाण झाली त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र अद्याप कुणावर गुन्हा नोंद केला नाही. दरम्यान पंचायत मंडळाच्या उपस्थितीत नागरिकांनी वाट मोकळी करून घेतली.