योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱयांना आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात आली आहे. खरीप हंगामांतर्गत शेतकऱयांना पीक विमा हप्ता भरण्यासाठी आवाहन केले जात आहे. शेतकऱयांनी 31 जुलैपर्यंत विविध पिकांचा विमा हप्ता भरावा. बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर आणि ग्राम वन सेवा केंद्रात ही सुविधा उपलब्ध आहे. शेतकऱयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
पिकांना संरक्षण मिळावे, यासाठी शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली आहे. खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के असणार आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, पूरपरिस्थिती, कीड आणि इतर रोगांमुळे पिकांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत ही योजना शेतकऱयांना आधार ठरणार आहे. पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक नुकसान झाल्यास या योजनेच्या माध्यमातून भरपाई दिली जाणार आहे.
जिल्हय़ात यंदा 53.7 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. विशेषतः भात, सोयाबीन, भुईमूग, बटाटा, मका, तंबाखू, सूर्यफूल आदींची पेरणी झाली आहे. मात्र काही ठिकाणी अतिपाऊस होऊन पुराचा फटका बसतो. त्यामुळे पिकांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत पीक विमा योजना साहाय्य देणारी ठरणार आहे. प्रतिकुल परिस्थितीत पिकांची पेरणी किंवा लागवड झाल्यास व नंतर पीक उत्पादनात घट होऊन नुकसान झाल्यास अशावेळीही योजना लाभदायक ठरणार आहे.
पीक विमा योजना शेतकऱयांना लाभदायक
नैसर्गिक संकट काळात पीक विमा योजना शेतकऱयांना लाभदायक असून शेतकऱयांनी 31 जुलैपूर्वी जवळच्या बँकेत, ग्राम वन कार्यालयात, सीएसी सेंटरवर विमा हप्ता भरावा.
– एच. डी. कोळेकर (उपनिर्देशक, कृषी खाते)